लेख आणि कथा

अनुक्रमणिका
*बुद्ध कथा
*कोल्हापुर
*मुद्दागुद्दी!
*अक्षरवार्ता
*एक लघु कथा
*वाजवा रे वाजवा
*आवडती शीर्षक गीते
*भारतीय रुपयाला अखेर बोधचिन्ह मिळाले
*पु.ल. देशपांडे यांचे किस्से
*चितळे मास्तर:पुल

*अशोक
बुद्ध कथा

भगवान गौतम बुद्ध नेहमीप्रमाणे मानवाचं कल्याण कसं होईल, त्याच्यातील चांगल्या गुणांना कशा त-हेने उघड करता येईल, यावर चिंतन करीत बसले होते. त्यांचे शिष्य सभोवताली बसले होते. त्यातील एका शिष्याने त्यांना प्रश्न केला, ‘‘भगवान, तुम्ही अखिल मानवजातीच्या समस्यांचा, त्यांच्या कल्याणाचा विचार करता, मग तुम्हाला तुमच्या सहवासात असणा-या शिष्यांच्या समस्या कशा लक्षात येत नाहीत?’’ ‘‘तुझी नेमकी काय समस्या आहे?’’ गौतम बुद्धांनी त्याला विचारलं. त्यावर तो शिष्य म्हणाला, ‘‘हा माझा अंगरखा पाहा. किती जुनाट झाला आहे. जागोजागी विटला आहे,फाटला आहे. मला कृपया नवीन अंगरखा द्याल का?’’ बुद्धांनी पाहिलं, तर खरोखरच त्याचा अंगरखा खूप फाटला होता. बुद्धांनी भांडारप्रमुखाला सांगून त्या शिष्याला नवीन अंगरखा देववला. मग बुद्धांनी त्या शिष्याला जवळ बोलावून विचारलं, ‘‘नवीन अंगरखा कसा वाटतो आहे? तुला व्यवस्थित होतो आहे ना?’’ त्यावर शिष्याने अतिशय समाधानाने सांगितलं की,त्याला तो अंगरखा अतिशय आवडला. यावर पुढीलप्रमाणे संवाद झाला.

बुद्ध : तुला आता नवीन अंगरखा मिळाला. मग तू त्या जुन्या अंगरख्याचं काय केलंस?

शिष्य : मी आता तो अंगरखा गादीवर टाकण्यासाठी अंथरूण म्हणून वापरतो.

बुद्ध : अच्छा! मग आधीची चादर काय केलीस? फेकून दिली असशील ना?

शिष्य : नाही, नाही भगवान, मी त्याचा वापर खिडकीला पडदा म्हणून करतो आहे.

बुद्ध : आणि त्या खिडकीचा आधीचा पडदा?

शिष्य : स्वयंपाकघरात गरम, तापलेली भांडी चुलीवरून उतरवण्यास या कापडाचा ‘पकड’ म्हणून उपयोग होतो.

बुद्ध : असं का? बरं, मग स्वयंपाकघरात या कामासाठी आधी वापरात असलेल्या कापडाचं काय?

शिष्य : भगवन! त्याचा वापर फरशी पुसण्यासाठी केला जातो.

बुद्ध : पण फरशी पुसण्यासाठी फडकी होती, त्यांचं काय केलं?

शिष्य : भगवन, या खोलीत तुमच्यासमोर हा जो दिवा लावला आहे नं, त्याची वात या फडक्यांपासून बनवली आहे!

भगवान गौतम बुद्ध हे ऐकून खूपच आनंदी झाले. त्यांना आपल्या शिष्याचा सार्थ अभिमान वाटला. अगदी सहज, दैनंदिन व्यवहाराचा एक भाग म्हणून कळत-नकळत गौतम बुद्धांच्या या शिष्याप्रमाणे निरुपयोगी, टाकाऊ आणि म्हणून ‘कचरा’समजल्या जाणा-या वस्तूंचं ‘रिसायकलिंग’ अथवा ‘रियूज’ करणारे असे अनेक जण आजही आपल्या समाजात आहेत.


 ......


कोल्हापुर


रांगडेपणाबरोबर  गुरगुर  आणि मस्ती, रंगेलपणा व शौकीनपणाबरोबर  जिवाला  जीव देणारी, कौतुकाबरोबरच  पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी व चैनीत, निवांत असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी, अघळपघळ मनाची माणसं कोल्हापूरचीच, दुसरी  कुठली?
कोल्हापूर. नदी-तलावात मस्तीत डुंबावं, लाल मातीत कुस्ती करावी, स्टार्चचे पांढरे कपडे, लहरी फेटा आणि कर्रकर्र वाजणारी पायताणं घालून मिरवावं अशी इच्छा या कोल्हापुरातला प्रत्येक पुरुष बाळगतो. तसं पाहता, इथं स्त्रिया म्हणजे "बाईमाणसं'देखील मिरवण्यात मागे नाहीत. त्याही सोन्यानं मढलेल्या. जरीकाठी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन, त्याचं एक टोक हातात धरून हाताची घडी अशा पद्धतीने वावरणाऱ्या. तर सामान्य कष्टकरी वर्गातल्या बायका नऊवारी लुगडं नेसणाऱ्या, डोक्यावर पदर घेऊन त्यावर वैरणीचा भारा किंवा दही-लोण्याच्या भांड्याने भरलेली बुट्टी घेऊन बाजारात जाणाऱ्या. अर्थात 20-25 तोळ्यांचे दागिने सहज त्यांच्या अंगावर चकाकताना दिसतील. कोल्हापुरी साज, चिताक, बोरमाळ, जोंधळी पोत, मंगळसूत्र, हातात बिल्वर, पाटल्या, बांगड्या, बोटात अंगठी, कानात बुगडी, कर्णफूल, कुड्या, वेल पाहायला मिळेलच. इथले पुरुषसुद्धा दागिने वापरण्यात मागे नाहीत. गळ्यात सोन्याची चेन, त्यात अडकवलेलं वाघनख, हातात सोन्याचं कडं, बोटांत अंगठ्या, मनगटात सोनेरी घड्याळ आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. इथला सामान्य कष्टकरीसुद्धा बऱ्यापैकी अंगभर कपडे घालून वावरताना दिसतो. पश्चिमेकडचा अतिडोंगराळ भाग आणि सांगलीचा पूर्वेकडील अति दुष्काळी भाग सोडला तर उर्वरित दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात समृद्धी नांदते. हळद, द्राक्ष, ऊस, भाजीपाला, भात अशा पिकांबरोबरच मुबलक पशुधन, हीच इथली समृद्धीची गुपितं. कृष्णा-पंचगंगा तर इथल्या जीवनदायिनी!
ईर्ष्या आणि उत्साह तर कोल्हापूरकरांच्या नसानसांत भिनलेला! घर बांधायचं असो किंवा लग्न-बारसं असो; ते दणकेबाज झालंच पाहिजे, ही इथली मानसिकता. अशा कार्यक्रमात मानापमानाची नाटकं भलतीच रंगतात. शुभकार्याला बहिणीने घराला तोरणं आणून बांधायची, त्याबरोबर पाच-पन्नास मंडळींना पुरेल असा "गारवा' आणायचा. "गारवा' ही तर भन्नाट पदार्थांची रेलचेल. भाकरी, पाटवडी, अंबील, घुगऱ्या, दही-भात, शेंगदाण्याची चटणी, कांदा असं दुरड्या भरून, वाजत-गाजत बहिणीनं तोरण घेऊन यायचं. भावाच्या घराचा उंबरा धुऊन ते चौकटीला बांधायचं. मग आप्तेष्टांनी यथेच्छ ताव मारायचा.
लग्न ही तर आठ-दहा दिवसांची बेजमी म्हणायला हरकत नाही. हळद जात्यावर दळायला आजूबाजूच्या बायका-मुलींना जमवायला सुरुवात झाल्यापासून मुहूर्तमेढ, लग्नाचा चुडा, गुगुळ, हळदी, साखरपुडा, अक्षता, लग्न, वरात, गोंधळ, जागर ते हळद काढण्यापर्यंतचे सगळी विधी पार पाडायचं म्हटलं तरी दहा-पंधरा दिवस वातावरण उत्साहानं भारलेलं राहतं. उखाण्यांपासून वरातीतल्या पेंगे (झोपेची डुलकी)पर्यंत धम्माल मजा असते. लग्न ठरलं की याद्या करण्यासाठी ज्येष्ठ मंडळी चर्चेला बसतात. देण्या-घेण्याचे मुद्दे सुरू झाले की मुख्य मुद्दा असतो नवरा-नवरीचे पोषाख. "मुलाचे कपडे कोण काढणार?' "मुलाचे कपडे मुलीकडच्यांनी काढावेत' आणि "मुलीचे कपडे मुलाकडच्यांनी काढावेत' हे सहजच बोललं जातं. पुढे बाजारपेठेत कपडे खरेदीला ही दोन्ही घरची मंडळी एकत्र येतात. परस्परांच्या आवडीने खरेदी होते. दुकानाबाहेर आमच्यासारखा ओळखीचा भेटला, की विचारपूस होते. ""काय, हिकडं कुठं?''
""आमच्या भाच्याचं लग्न ठरलंय, म्हणून कपडे काढायला आलोय.'' "कपडे काढणं' म्हणजे "खरेदी करणं' हा खास इथला अर्थ ज्यांना माहीत नाही त्यांना त्यापुढची चर्चा अधिक खुमासदार वाटेल.
""मग कुठे काढले कपडे?''
""मुलीचे चंद्ररूप वालावलकरमध्ये आणि मुलाचे रेमंडमध्ये.''
""मग?''
""मग काय! आम्ही दोघांचे कपडे काढून सोळंकीत आइस्क्रीम खायला आलोय.''
आपण काय बोलतो, त्याचा अर्थ काय होतो याच्या परिणामांची पर्वा या अघळपघळ लोकांमध्ये नाही.
"चौकश्या' करणं हा इथल्या रिकामटेकड्यांचा खास उद्योग. खरं तर याला "दुसऱ्याची मापं काढणं' असा वाक्‌प्रचार अस्तित्वात आहे. अशा वाक्‌प्रचाराप्रमाणेच अनेक विशेषणं, क्रियापदं, अनेकवचनं यांच्याही खास शैली इथे रुजल्या आहेत. "पॅन्टी शिवायला टाकल्यात, त्या आणायला निघालोय' असं वाक्य इथे सहज कानावर पडतं. "पॅन्ट'चं अनेकवचन आमच्याकडे "पॅन्ट्‌स' असं न होता "पॅन्टी' होतं. भाषेच्या अशा अनेक करामती इथं होतच असतात. "निघालो आहे' असं म्हणण्याऐवजी जरा जोर देऊन "निघालोय' असा शॉर्टकट आम्ही सर्व क्रियांसाठी वापरतो. उदा. खायलोय, करायलोय, जायलोय, बघायलोय, टाकायलोय, यायलोय वगैरे.
तसं पाहता कोल्हापुरी भाषेला एक वेगळाच बाज आहे. इथे शिवीचा आवर्जून वापर होतोच; पण कोल्हापुरी अस्सलपणा किंवा झणझणीतपणाबरोबर "शिव्यां'च्याही अनेक छटा इथे दिसतात. "ये रांडंच्या' हे रागाच्या भरात जेवढं जोर घेऊन येतं, तेच "काय रांड्या, कुठं गेलतंस?' ही अगदी जिवाभावाच्या मित्राच्या चौकशीची सुरुवात असू शकते. "ते रांडंचं...' असं दोघांनी चर्चा करताना तिसऱ्याबद्दल बोललेलं असतं; पण त्यात पुढे कौतुक, चेष्टा, टवाळी, सहानुभूती, प्रेम, आदर यापैकी काहीही असू शकतं. म्हणजे "ते रांडंचं लई भारी पडलं बघ!', "ते रांडंचं लई शिकलंय रे!', "ते रांडंचं असंच राहिलं बघ!' वगैरे. पण काही म्हणा, जिवाभावाच्या मित्रानं आपल्याला तशी हाक नाही मारली तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. शब्दाचा अर्थ शिवीजन्य असला तरी तो इथं आप्तजनांसाठीच आहे. शिक्षक, मित्राचे वडील, समाजातील प्रतिष्ठित यापैकी कोणालाही हे बिरूद लावून बोलण्यास इथे मुभा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण याशिवाय इतर शिव्यांनी उद्धार सुरू झाला तर मात्र कोल्हापूरकरांचा इगो दुखावला जाऊ शकतो. मग मात्र "पायताण' अथवा "तलवार' असे दोन आणि फक्त दोनच पर्याय कोल्हापूरकरांना माहीत आहेत. आणि हो; इथे शिवीमध्ये प्राण्यांचा वापर होऊ शकतो. प्राधान्यक्रमावर घोडा, गाढव इत्यादी!
इथल्या इतर काही भाषिक वैशिष्ट्यांची ओळख नोंदवणंही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अनेक भाववाचक नामांचं आम्ही अनेकवचन करू शकतो. म्हणजे प्रेमं, भुका, चैन्या! बोलताना "हं, तुमी करा प्रेमं आणि आमी बघत बसतो!'; "काय, चैन्या करायलंस!'; "चला, आमानी भुका लागल्यात!' असं म्हटलं जाऊ शकतं. तसंच "केस'चं "केसं', "दगड'चं "दगडं', "पॅन्ट'चं "पॅन्टी' वगैरेही इथे सर्रास होऊन जातं.
आणखी एक खासियत म्हणजे "तो', "ती', "ते' हे अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, आणि नपुसकलिंगासाठी वापरायचं, असं व्याकरणशास्त्र म्हणतं. पण इकडचं व्याकरण जगावेगळं आहे. "तो गेला' असं म्हणण्याऐवजी "ते गेलं की' असं म्हणून व्याकरणाची आम्ही खांडोळी करू शकतो. इथल्या स्त्रिया बोलताना "मी आले' असं म्हणण्याऐवजी "मी आलो', "मी गेलो' वगैरे म्हणतात. असं का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येतं, की हे मराठा राजधानीचं गाव आहे. "आम्ही आलो', "आम्ही गेलो-चाललो' वगैरे विधानं ही राजघराण्यातील व्यक्तींच्या बोलण्यातून आलेली आणि इथल्या माणसांच्या बोलण्यात, भाषेत, संवादात रुजली आहेत.
इथल्या चौकातल्या मंडळाजवळ किंवा तालमीच्या दारात बसून सुरू असणारी वर्णनंसुद्धा एकदम झकास! इथली "नाद कराय नाही', "नादखुळा रे...' अशी खास कोल्हापुरी रचना महाराष्ट्रभर नेली ती अवधूत गुप्ते यांनी. कोणी दुसऱ्याला एखादी गोष्ट अतिरंजित करून सांगत असेल किंवा मैत्रिणीला कडेला घेऊन सांगत असेल, तर जाता जाता "फशीव', "गंडीव' असा आवाज टाकून गेलं की भलतीच अडचण होऊ शकते. ही गोष्ट फक्त इथेच घडते. फुटबॉल आणि हॉकी हे आमचे "गावखेळ' आहेत. इथे मैदानात शिट्‌ट्यांबरोबरच शेलकी वाक्यं ही चिअरअपसाठी असतात आणि नंतर इतरांना त्यांच्या हायलाइट्‌स चौकात उभारून सांगताना "नादखुळा रे', "एकदम गड्डा जाम', "खटक्यावर ब्यॉट जाग्यावर पलटी' हे मॅच, कुस्ती, अपघात, प्रेमप्रकरणं यापैकी कशासाठीही सोईने वापरायचं "विशेषण वाक्य' असतं.
हां, आणखी एक आठवलं. इथल्या तरुण मंडळांची नावंसुद्धा भन्नाट आहेत. झाड ग्रुप, कलकल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पॉवरफुल्ल चिक्कू मित्रमंडळ...! यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. रिक्षाच्या मागील बाजूस किंवा मडफ्लॅपवर लिहिलेला मजकूरसुद्धा असाच अभ्यास करण्यासारखा. "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं', "तशी मी गावायची नाय,' वगैरे... हे सुचतं कसं, यापेक्षा ही या गावाची ओळख बनत गेली आहे, हे महत्त्वाचं! चेष्टामस्करीलासुद्धा एक खुलेपणा असावा लागतो. तो इथं आहे. इथं अनेक "टर्मा'ही (टर्म) तयार झाल्या आहेत. उदा. रंगाखुष, पाला झाला, हारकुन टुम्म! चेष्टा कुठं करावी यालाही इथं मर्यादा नाहीत. एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा दिलेला समोरून येणाऱ्याला इथे सहज विचारून जातो, ""काय, बसणार काय डब्बलशीट?'' खऱ्या अर्थानं हे सारं आघळपघळ.
पुण्यामध्ये पत्ता शोधायचा, विचारायचा तर "जोशी कुठं राहतात हे इथं विचारू नये' अशी पाटी वाचायला मिळते. कोल्हापुरात मात्र बरोबर याच्या उलट दृश्य पाहायला आणि अनुभवायला मिळतं. चौकात किंवा कोपऱ्यावर उभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तीची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील...""अरे, त्या बॉबकटचा बाबा रे! काळं गिड्डं रे ते!'' हे पत्ता विचारणाऱ्याच्यासमोर होऊ शकतं. त्यापुढे पत्ता सांगून रिकामे. ""हे बघा, सरळ-स्ट्रेट जावा. पुढं एक गोल-सर्कल लागंल, तितनं लेफ्ट मारा (चालतानासुद्धा!). त्या बोळात एक पायपीचा (ट्यूबलाइटचा) डांब (खांब) लागंल. त्याच्या जरा पुढं गेला की पाण्याची चावी (नळ) दिसंल. तिथं बायका हायेतच; त्या त्यांच्याच!'' एवढं ऐकून गोंधळलेला पाहुणा आणखी गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला ""ए बारक्या, जा ह्यास्नी सोडून ये,'' असं सांगणार. हे सगळं "आपल्या गल्लीत' आलेल्या पाहुण्यांसाठी, हे लक्षात घ्यायचं. ते पाहुणे परत जाताना पुन्हा दिसलेच, तर "पावनं, गावलं नव्हं घर?'' असं आवर्जून विचारणार आणि रिक्षाला हाक मारून पाहुण्यांना त्यात बसवून निरोप देणार. "पायीप' म्हणजे ट्यूबलाइट, डांब म्हणजे खांब, चावी म्हणजे नळ...असे बरेच शब्द हे खास कोल्हापुरी शब्दकोशातले, हे समजलं असेलच. त्याचबरोबर अनेक समानार्थी शब्द, वाक्‌प्रचार, विशेषणं वगैरेंचा स्वतंत्र कोश आहे; पण तो केवळ मौखिक असल्याने समजून घ्यावा लागतो वा अभ्यासण्यासाठी इथंच जन्म घेऊन लहानाचं मोठं व्हावं लागतं.
शिवाय इथे ऍडिशनल बोनस म्हणून "दाद' कशी द्यावी याचं खास प्रशिक्षणाचं पॅकेजही आहे. इथे कुस्तीला, तमाशातल्या नाचाला, ढोलकीच्या तालाला, शास्त्रीय संगीताला, रश्शाला, मटणाला, सिनेमाला, खेळाला, जनावराला "दाद' देण्याचे वैविध्यपूर्ण असे प्रकार आहेत. शिट्टी कधीही वाजवायची नसते. विशिष्ट दाद, अदा, अर्थ, झटका ही लावणीत वापरण्याची शिट्टीची ठिकाणं. पण ढोलकीवर थाप पडल्यापासून अनेक ठिकाणं खास असतात. ढोलकीचा आवाज बारीक होत जातो तेव्हा आपला आवाज बंद ठेवून "बारीक' म्हणून आवाज येऊ शकतो, तीही "दाद'! सही मागायला नाही, पण "हेऽ झकास! पुन्यानदा व्हायला पाहिजे!' असं त्या कलाकाराला खासगीत भेटून इथली माणसं नंतर सांगतीलच, पण घरी येण्याचंही आमंत्रण देतील.
इथे मैदानातलं चिअरअप आणखीनच जोशपूर्ण! खास प्रतिस्पर्धी संघावर भीतिदायक किंवा आक्रमक छाप टाकायची असेल तर पहिल्याच टप्प्यात प्रभावी कृती केली जाते, त्यासाठी इथे हमखास "हाबकी डाव' असा शब्दप्रयोग केला जातो. "सिनेमाला दाद' याबाबत अमान मोमीन या कोल्हापूरच्या पण वास्तव्याला अमेरिकेत असणाऱ्या एका रेडिओ प्रोग्रॅमरने सांगितलेला किस्सा छान आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, थिएटरच्या चौकात जाऊन गर्दी जास्त कुठून बाहेर येते ते पाहावं. गर्दीतल्या एखाद्याला विचारलं तर तो जे सांगेल त्यावरून सिनेमाचं तिकीट काढायचं. त्यातही कोल्हापुरी प्रेक्षक असेल तर "शिनेमा एकदम खल्लास', "दिलप्यानं तोडलंय रेऽ', "आणि "वैजी जाळ हाय' असं दिलीपकुमार आणि वैजयंतीमालाच्या सिनेमाचं वर्णन ऐकायला मिळू शकतं. याला "दाद' म्हणावं!
"निवांत!' या शब्दाची व्युत्पत्ती शोधायला गेलं तर त्याचं मूळ नक्की कोल्हापुरातच असेल. खूप कष्टाची तयारी असली तरी इथलं जगणं प्रत्यक्षात निवांत आहे. पण हे पेन्शनरांचं गाव नाही. मग निवांत म्हणजे नेमकं काय? तुम्ही कोणालाही विचारा, "काय चाललंय?' किंवा "काय विशेष?' तर उत्तर एकचः "निवांत!' कारण गावाची लांबी-रुंदी पाच बाय सात किलोमीटर. म्हणजे कामाच्या ठिकाणी जायला किंवा यायला जास्तीत जास्त अर्धा तास. त्यामुळे त्याआधी आणि त्यानंतर निवांतच वेळ असतो. मग चौकात गप्पा नाहीतर चकाट्या. त्यामुळे "निवांतपणा' हा रक्तातच भिनलेला. शेती असणारेसुद्धा ऊसवाले. उसाचं पीक हे जरा इतर पिकांपेक्षा वेगळं. एकदा त्याची लागवड केली की तीनदा पीक फक्त कापून फॅक्टरीला पाठवायचं, नाहीतर गुऱ्हाळाला. त्याला पाणी पाजणं हे काम. मोटर सुरू केली की पाटाने सरीतून ते आपोआप जातं. सगळ्या शेताला पाणी पोहोचलं का, हे पाहायला इथला शेतकरी वेगळी ट्रिक वापरतो. मातीचं एक ढेकूळ किंवा दगड उचलून अपेक्षित दिशेने फेकतो. जर "डुबुक' असा आवाज आला तर पाणी पोचलंय. मग मोटरचा खटका (स्विच) बंद. झालं, वर्षातनं दोन-चार वेळेला कारखान्याचं बिल किंवा गुळाची पट्टी मिळाली की काम खल्लास. अर्थातच इथलं सगळं कसं "निवांत'! म्हणूनच मोटरसायकल घेऊन गावात फिरायला रिकामी झालेली इथली मंडळी शौक जपतात आणि सामान्य माणसंसुद्धा किरकोळ काम करून माशाचा गळ घेऊन निवांत टाइमपास करताना दिसतात.
माशाच्या गळावरून आणखी एक मुद्दा सांगितलाच पाहिजे, तो म्हणजे इथल्या तळ्यांचा. हे तळ्यांचं किंवा कमळांचं गाव. "कोल्लंं' म्हणजे कमळ. म्हणून कोल्लापूर, अशी एक व्युत्पत्ती गॅझेटियरमध्ये नमूद आहे. संपूर्ण तटबंदी, त्याभोवती खंदक आणि सात प्रवेशद्वारं असलेल्या या गावात 24 तळी असल्याचे उल्लेख आढळतात. नियोजनाच्या अभावामुळे आणि परिणामांचा विचार न केल्याने इथली सगळी तळी खरमाती, कचरा, निर्माल्य-मूर्त्यांनी बुजली; पण तळ्यांशी नाती मात्र सतत टवटवीत आहेत. "रंकाळा' हे त्याचं साक्षात उदाहरण. तरुणाई याच रंकाळ्याच्या काठावर फुलते. नजरानजर, आणाभाका आणि लग्नानंतर कोणी आपल्याकडे बघत नाही ना, हे लक्षात घेऊन लग्नाच्या बायकोच्या हातात हात घेऊन चालायचा प्रयत्न करणाऱ्या जोड्या, रिटायर मंडळी, आंबटशौकीन, व्यायाम करायला येणारी मंडळी या सगळ्यांशीच रंकाळ्यानं नातं जोडलं. अगदी आबालाल रहमान, बाबूराव पेंटर, माधवराव बागल अशा अनेकांच्या कुंचल्यांनी इथं पेंटिंग चितारली. अनेक कॅमेऱ्यांनी इथला सूर्यास्त टिपला. व्ही. शांताराम, दादा कोंडके, भालजी पेंढारकर यांनी सिनेमा चित्रीकरणासाठी रंकाळ्याची निवड केली. पर्यावरणीय मुद्यांसाठी झालेल्या अनेक आंदोलनांत सहभागी होऊन हजारो लोकांनी रंकाळ्याबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. आजही हा रंकाळा कोल्हापूरच्या गळ्यातला ताईत आहे.
भेळ ही कोल्हापुराची आणखी एक खासियत. नेहमीपेक्षा ही भेळ जरा वेगळी. राजाभाऊ हे भेळप्रकरणातलं अग्रणी व्यक्तिमत्त्व. इथले चिरमुरे हे पाणचट आणि पोकळ नसतात. थोडीशी खारट चव असणाऱ्या भरीव चिरमुऱ्यांची इथे झक्कास भडंग केली जाते आणि मग त्यात फरसाण, चिंचेचा कोळ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, त्यावर कैरीची तिखट-मीठ लावलेली फोड कागदाच्या वाडग्यात घेऊन कागदी चमच्याने खायची. या भेळीचा आंबटगोडपणा जगण्यात नाही मुरला तरच नवल!
खाण्यापिण्याला दाद ही तर इथल्या चटपटीतपणाची करामत आहे. कोल्हापुरी मिसळीचा नाष्टा हा घाम फोडणारा असतो. एकदा ही मिसळ खाऊन पहा. मग दही-मिसळ, मटणाच्या शिळ्या रश्शाची मिसळ, भज्यांचा चुरा घालून मिसळ, दूधमिसळ असे पुढचे टप्पे खायला कोल्हापूर बुकिंग सुरू होईल. इथली मंडळी मटणाला "हावरी' आहेत असं म्हणतात. पण खरं तर तसं नाही. ती मटणावर प्रेम करतात, त्याबरोबर जगतात, असं म्हटलं तर चूक नाही. जन्मानंतर जी पाचवीची पूजा केली जाते तिथेच नैवेद्य म्हणून बकऱ्याची मुंडी आणि पाय दाखवले जातात. कदाचित त्याचा हा परिणाम असेल. इथे दिवाळीपासून पाडव्यापर्यंत खेडोपाडी "माही जत्रा' असते. मोटरसायकलवरून तब्बल 50-100 किलोमीटर "तिब्बलशीट' प्रवास करून माहीचं जेवण जेवायला जाणारे "मटणप्रेमी' इथेच भेटतात. हे जेवण थोड्याफार मद्यसेवनाने सुरू होतं. ढिगभर भातावर हवा तेवढा रस्सा यावेळी मिळू शकतो. मटणाचा खडा (फोड) चुकून एखादा आला तर आला, पण "रश्शासाठी जगावं' हा मूलमंत्र जपण्यासाठीच जेवायचं आणि या जेवणाला आमंत्रण असावंच लागतं असंही नाही. अनोळखी घरात मित्रांबरोबर आपण जाऊ शकतो. आपल्याला अगत्यपूर्वक जेवण मिळेल याची खात्री आहे आणि माणसं वाढली, असं यजमानांना वाटलं तर रश्शामध्ये पाण्याची घागर ओतून चटणी-मीठ टाकलं की बस्स! या रश्शाला इथे "खुळा रस्सा' असं म्हटलं जातं. हॉटेल किंवा थोड्या बड्या घरात जेवणाचा योग आला तर पांढरा रस्सा, पुलाव, गोळी पुलाव, दम बिर्याणी, खिमा असे खास पदार्थ मिळतील. शाही जेवणात 12 प्रकारचे रस्से असत. शिवाय कुंभार समाजात केली जाणारी रक्ती, घिसाडी समाजाकडून भाजून आणलेल्या मुंडीचा रस्सा, गावठी कोंबडीचा रस्सा, अगदी गरीबाघरी अगत्यानं केली जाणारी भाकरी व अंड्याची पोळी (ऑमलेट), खर्डा, झुणका, दही हे आमचं मेनूकार्ड कोणाशी स्पर्धा करणारं नाही पण मिरवणारं मात्र आहे.
इथल्या दुधाला येणारी सायसुद्धा इथल्या दाटपणाची ओळख देणारी आहे. दुधापासून बनलेली बासुंदी आणि कंदी पेढे हे नृसिंहवाडीसारख्या परिसराचे खास पदार्थ आहेत. इथे कवठाची बर्फी हासुद्धा स्पेशल पदार्थ. आणखी एक- कोल्हापूरकडच्या परिसरात चहा जरा जास्त गोड असला तरी दुधाचा असतो. कोल्हापूर शहरातल्या जुन्या चौकांमध्ये आजही म्हशीचं धारोष्ण दूध तिथल्या तिथे पिळून फेसासह दिलं जातं. सोडा-लिंबाला जसा फेस येतो तसा या ग्लासमधल्या दुधावर येतो. मिश्यांना किंवा ओठांना लागलेला फेस शर्टाच्या हातोप्यानं पुसला की गावभर फिरायला ओके! इथं "सोळंकी आइस्क्रीम' हे प्रस्थ तब्बल तीन-चार पिढ्या घरा-घरांशी नातं जोडून आहे. बाहेरून आलेली कोणतीही कंपनी- कोणतंही आइस्क्रीम इथं पाय रोवू शकलं नाही. त्याशिवाय थंडाई इथं तालमीत पैलवान तयार करतात किंवा आइस्क्रीमच्या दुकानात. "दुकानात' हा शब्द मुद्दाम नोंदवला. कारण बारा महिने फक्त आइस्क्रीम विकणारी प्रशस्त अशी पन्नास तरी दुकानं या गावात आहेत. त्या दुकानांमध्ये ब्रॅंडेड शीतपेयं आजही मिळत नाहीत. इथं अजूनही "सोडा फाउंटन' आहेत. नुकतंच सचिन पिळगावकरांनी पुरवलेल्या माहितीप्रमाणे जगात असं फाउंटन असणारी दोनच शहरं आहेत, त्यापैकी कोल्हापूर एक आहे. आजही इथे बाटलीतला गोटी सोडा आहे.
दुधातला आणखी एक खास पदार्थ म्हणजे "खरवस'. खरवसाच्या वड्या आणि बर्फी हे अफलातून आणि दुर्मिळ पदार्थ. कॅरामल पुडिंग ही जरी पार्टीची स्वीटडिश असली, तरी खरवस ही इथली म्हशीला झालेल्या पिल्लाच्या जन्मानिमित्त तयार झालेली सेलिब्रेशन डिश आहे. तशी आणखी एक स्पेशल गोष्ट म्हणजे "काकवी'. हा आमचा देशी "शुगरकेन जॅम'! शिवाय उसाचा रस, भेळ, चिरमुऱ्याचे लाडू, चिरमुरे हे फक्त टाइमपास आयटम.
एव्हाना इथल्या नॉनव्हेजला जगमान्यता मिळाली आहे. अगदी जगभरातल्या पंचतारांकित हॉटेलांच्या मेनूकार्डवर कोल्हापुरी रेसिपीजना "मटण कोल्हापुरी' अशी ठसठशीत जागा मिळाली आहे. पण ही जागा का मिळाली; या प्रश्नाचं उत्तर कोल्हापुरी चटणीशी जोडलेलं आहे. ही चटणी तयार करणं म्हणजे एक दिव्य असतं. विशिष्ट प्रमाणात सुमारे पंचवीस ते अठ्ठावीस मसाल्याचे पदार्थ क्रमाने एकत्र होत जाऊन त्यासोबत कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीपूड एकजीव होते. त्याचा रांगडा वास असतो. त्याला "कोल्हापुरी चटणी' म्हणून ओळखलं जातं. रस्सा-मटणाचं ती ईप्सित आहेच; पण नवी चटणी बनते त्या दिवशी गरम भाकरी, तेल आणि चटणी खायला नशीब लागतं आणि त्यासाठी कोल्हापुरात जन्म घ्यावा लागतो!
बटाटेवडा हे सामान्यांचं मधल्या वेळेचं मिष्टान्न! पुण्यातला जोशीवडा आणि बॉम्बेवडा यांना कोल्हापूरचा वडा पुरून उरतो. कारण घसघशीत आकार नि डाळीच्या पिठाचं जाडजूड आवरण! तो खमंग आणि खुसखुशीत तळलेला असतो. वडा-पाव किंवा कटवडा खाऊनच बघा! आणि मिलनची कांदाभजी, माळकरांची जिलबी, खासबाग किंवा बावड्याची मिसळ, चोरग्यांच्या मिसळीचा कट, एल.आय.सी. कॅंटीनची खांतोळी व इंपीरियलची थंडाई तर भन्नाटच!
एकूणच, कोल्हापुरी पदार्थ हा अनेकांचा वीक पॉइंट आहे.
पुणेरी बाकरवडी आणि कोल्हापुरी बाकरवडी अशी स्पर्धा असली, तरी बनवणाऱ्या माणसांची ठेवणच वेगवेगळी आहे. आजही कोल्हापुरात बारसं ते मृत्यू अशा प्रवासात अनेक जेवणावळी होतात; पण कोणी मयत झालं तर दहा दिवस आजही त्या घरात चूल पेटत नाही. इथली माणुसकीची ठेवण औरच आहे. शेजारधर्म म्हणजे काय, याचा हा वस्तुपाठ. गल्लीत कोणी मयत झालं तर प्रत्येकाच्या घराची कडी वाजवून निरोप दिला जातो. शहरीकरणाच्या बदलांबरोबर ही रीत मात्र बदलेली नाही. अंत्यविधीसाठी लागणारं साहित्य आणायला पैसे कोणीतरी परस्पर खर्च करतं, पण त्या कुटुंबीयांकडून ते नंतर संबंधिताला दिले जातात. दहा दिवस शेजारी व नातेवाईक त्या घरातील सर्वांचं जेवण, चहा, नाष्टा आपणहून आणून देतात. कोल्हापूर शहरात तर अंत्यसंस्काराला आवश्यक लाकूड-शेणी महापालिका मोफत पुरवते. तसं इतर साहित्य ज्या ठिकाणी मिळतं ती मोजकी ठिकाणं आहेत. तिथला संवाद हा विशेष आहे. रात्री-बेरात्री त्या घराचं दार वाजवलं की वरची खिडकी उघडून विचारणा होते, ""बाई की बापय?'' जर "बाई' असं उत्तर दिलं, तर ""विधवा की सवाशीण?'' असा पुढचा प्रश्न विचारला जातो आणि काही मिनिटांत सगळं साहित्य पावतीसह ठेवलं जातं. या गावातली आणखी एक ठळक नोंद केली पाहिजे. इथले फूलवाले मयताच्या हाराच्या दराची घासाघीस करत नाहीत. ठेवले जातील तेवढे पैसे घेतले जातात. रात्री फुलांची दुकानं बंद झाल्यानंतर मृतदेहाला हार लागणार, हे लक्षात घेऊन ते दुकानाबाहेर लटकावून ठेवले जातात. आपण हार घेऊन पैसे ठेवले किंवा नंतर दिले तरी चालतात, ही इथली संस्कृती आहे. शेजारधर्म सांभाळण्याइतकीच दुश्मनीही इथे असू शकते; पण एखादा दु:खद प्रसंग घडला, की तिथे दुश्मनीसुद्धा धावून जाते आणि एकोपा होतो.
"एकोप्या'वरनं आठवलं. देशभरात हिंदू-मुस्लिम द्वेषाची बीजं पेरली गेली असली तरी त्याला कोल्हापूर हा अपवाद आहे. इथे मशिदीच्या चौकटीवर "गणपती' दिसू शकतो. गणपतीचं दर्शन घेऊन बाबूजमाल दर्ग्याचं दर्शन घेणारे मुस्लिम-हिंदू तुम्हाला इथे नेहमीच दिसतात. पीराच्या उत्सवात पुढाकार हिंदूंचा; इतकंच नव्हे, तर पीर आणि गणपती एका मांडवात असणार, हेही दृश्य इथलंच! बकरी ईद मुस्लिमांशिवाय इतरांना जरा लवकर यावी असं वाटतं, कारण बिर्याणी आणि खीर चापून खाण्याची ती संधी असते. नकळत दोन-चार घरांतून आमंत्रण किंवा डबा येणार हे नक्की असतं. नृसिंहवाडीच्या संगमावर चालणारे अंत्यसंस्कारांनंतरचे विधी ब्राह्मणाकडून हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचेही होताना दिसतात. हे इथल्या संस्कृतीचे आदर्श पैलू आहेत.
इन्व्हेस्टमेंट! पैसे रियल इस्टेटमध्ये गुंतवणं किंवा बॅंकेत ठेवणं हा प्रकार इथल्या जुन्या वळणाच्या लोकांच्या अंगवळणी पडणं अवघड. हा सगळा खरं तर चोरीचा मामला असतो. म्हणजे वेगळं काही नाही; पण एकत्र कुटुंबात कुणाला कळू नये यासाठी करायचा हा खटाटोप. अनेकदा बॅंकेचं पत्र आलं तर घरात भांडणाचं निमित्त व्हायचं, म्हणून तिकडं जायचं नाही. बाजारहाटीतले बाजूला काढलेले पैसे वर्षात साडेतीन मुहूर्ताला हळूच काढून अगदी ग्रॅम-दोन ग्रॅम सोनं घेऊन ठेवायचं, ही बाईमाणसांची आयडिया आजही सुरू आहे. पुरुष मात्र पैसे ठेवतात ते भिशीमध्ये. भिशी हे प्रकरण खाण्या-पिण्याचं नाही, पण दिवाळीला बोनस नाही मिळाला तरी तोंड वाकडं होऊ नये म्हणून! उच्च मध्यमवर्गीयांनी मात्र रिटायरमेंटनंतर मिळालेले पैसे काही बॅंकांत व्याजदर जास्त म्हणून गुंतवले; पण अनेक पतसंस्था, बॅंका बुडाल्या आणि तेसुद्धा बुडाले. खरं तर आज विश्र्वासार्हता कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा जमिनी-सोन्याकडं गुंतवणुकीचा कल दिसतो. म्हणजे अडीअडचणीला तारण ठेवून पैसे उभे करता येतात, हा विश्र्वास त्यांना वाटतो.
आपल्या घराचं स्वप्न पाहताना मूळचे कोल्हापूरकर कधी फ्लॅट सिस्टिममध्ये रमत नाही. दोन-तीन दशकांपूर्वी शिक्षक, क्लार्क अशा मध्यमवर्गीयांनी हजार-पंधराशे स्क्वेअर फुटांचा प्लॉट घेऊन दोन-तीन खोल्यांची घरं बांधली. घरांना आई-वडील किंवा स्वत: पती-पत्नींचं नाव देण्याची क्रेझ. पण नाव मात्र ठसठशीत आणि कोरीव. ते बघूनच अभिरूची स्पष्ट होणार हे नक्की. "मातृ-पितृ-छाया' या कॉमन नावापासून अफलातून कॉंबिनेशन्स इथे दिसतील. "प्रगुंपा' असं एका घराचं नाव. अर्थ काय? प्रमिला गुुंडोपंत पारगावकर. नावातल्या पहिल्या अक्षरांपासून घराचं नाव तयार करण्याची ही किमया फक्त कोल्हापुरातच दिसते.
इथली ऐसपैस परिसर असलेली बैठी घरं अंगण-परसाला जोडून साधेपणा जपतात. अगदी अलीकडे इथली वाडासंस्कृती कमी झाली; पण अजूनही हाकेला "ओ' मिळते. पाहुणे आल्यावर कपभर दूध किंवा लिंबू मिळवण्यासाठी किंवा अंगती-पंगतीसाठी इथं शेजार आहे. आईचा स्वयंपाक व्हायचा असेल तर शेजारच्या मावशींकडून डब्यात भाजी घेण्यासाठी लाजण्याचा प्रश्नच येत नाही. आजही उन्हाळ्यातले पापड, सांडगे, शेवया करताना एकमेकींच्या सोयीनुसार "टाइम-टेबल' होतं. एकमेकींना मदत करणाऱ्या काकू-मावशींशी रक्ताच्या नात्यापलीकडची नाती आजही आहेत. बायका-मुलं सुटीत डबे घेऊन पन्हाळा, कात्यायनी, वाडीला जाताना दिसतात, तर पुरुष मंडळी त्यांच्या एंजॉयमेंटला "रस्सा मंडळ' करतात. म्हणजे काय? भाकरी-भात आपापल्या घरातून आणायचा, वर्गणी काढून फक्त मटण करायचं आणि निवांत बसून जेवायचं.
नदी-तलावावर मासे पकडण्यासाठी दिवसभर गळ घेऊन बसणारेसुद्धा इथे दिसतात; तेही स्वत:च्या करमणुकीसाठी. तालमीत व्यायाम, फुटबॉल किंवा हॉकीचा सराव, बुद्धिबळाचा पट, कॅरम मंडळ किंवा मर्दानी खेळाचा सराव ही इथली मनोरंजनाची साधनं. नाटक, गाण्याचा कार्यक्रम, भजनी मंडळ हीसुद्धा मनोरंजनाची माध्यमं आजही वापरात दिसतात. इथली ग्रामीण आणि शहरी अशी तफावत मात्र विशिष्ट बाज असणारी आहे. मुंबई-पुण्यात घोड्यांच्या शर्यतीचा रेसकोर्स हा श्रीमंती खेळाचा आकर्षणाचा विषय आहे. इथं पूर्वी रेसकोर्स होतं, हत्तीची साठमारी, चित्त्याकडून किंवा ससाण्याकडून शिकार हे चित्तथरारक खेळ होते. आजही इथे म्हशी-रेडकांच्या शर्यती, बकऱ्यांच्या टक्करी, कोंबड्यांच्या झुंजी, कबुतरांच्या शर्यती, चिख्खल गुट्टा, पतंगाच्या स्पर्धा या पुरुषांच्या मनोरंजनाचा भाग बनतात. आज संगणकाच्या युगातही स्त्रियांच्या उखाण्यांच्या स्पर्धा, फुगड्यांची स्पर्धा, पाककलेच्या-रांगोळीच्या स्पर्धा होतात. स्त्री-पुरुषांच्या भजनीमंडळाच्या स्पर्धाही रंगतात.
"म्हशी' हा इथे चर्चेचा विषय असतो. अत्यंत देखण्या, चकचकीत काळ्या म्हशीची लांबसडक शिंगं, शेपटीचे कातरलेले केस आणि कानाच्या नक्षीदार पाळ्या (मुद्दाम केलेल्या) या गोष्टी त्यांना सौंदर्यस्पर्धेत बक्षिसं मिळवून देणाऱ्या ठरतात. मुलींच्या सौंदर्यस्पर्धांना मात्र इथे उत्तेजन मिळालं नाही. सलवार-कमीज किंवा पंजाबीत वावरणाऱ्या मुली थोडीफार फॅशन करतील; पण त्यांना अजून जीन्स आणि शॉर्ट टी-शर्टकडे सरकता आलं नाही. अशा प्रयत्नांना घरांतून विरोध आहे. "ते आटलेल्या कापडाचं कपडं घालून फिरू नको' अशी धमकीवजा सूचना ही इथे मिळते. इथल्या उच्चवर्गीयांच्या मुला-मुलींचा वावर असणारी कॉलेजच ड्रेसकोडचं समर्थन करणारी आहेत. कोल्हापूरबाहेरून आलेली मंडळी थोडीफार अशा नव्या फॅशनचा वापर करताना दिसली, तरी सार्वजनिक ठिकाणी पारंपरिक वेशभूषेला मिळतंजुळतं वागण्याचा दबदबा असतो.
वेशभूषेचा उठावदारपणा लग्नसमारंभात सगळीकडेच दिसतो, पण कोल्हापुरात दसऱ्याच्या शाही समारंभात तो आवर्जून पाहण्यासारखा असतो. महाराष्ट्रात लवाजम्यासह सीमोल्लंघनाला जाण्याची परंपरा फक्त कोल्हापुरात आजही पाहता येते. जुन्या राजवाड्यापासून आणि अंबाबाईच्या मंदिरातून निघालेल्या पालख्या, तोफगाडा, रणवाद्यं, घोडे, उंट, संस्थानचं पायदळ, शाहीर व पैलवानांचा ताफा, छत्र-चामरं, ध्वज, तलवारी-भाले, जरीपटका, मानकरी बॅंड, पोलिस आणि मिलिटरीचा बॅंड अशी भव्य लवाजम्याची मिरवणूक सूर्यास्तापूर्वी दसरा चौकात पोचते. शहरातील मान्यवर, प्रतिष्ठितांसह नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा सुरू होतो. आजही "छत्रपती' पोचल्यानंतर संस्थानाचं राष्ट्रगीत वाजतं, पूजाविधी होऊन बंदुकीच्या फैरी झडतात आणि लक्कडकोटातून आपट्याची पानं लुटण्यासाठी झुंबड उडते. त्यानंतर लोकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राजा सर्वांना भेटतो. ही परंपरा आजही सुरू आहे. या परंपरेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवीची पालखी सीमोल्लंघनाहून परतताना दलितवस्तीतून जाते. तो दिवस दिवाळीपेक्षा मोठा साजरा होतो, कारण जातीतील विषमतेची दरी संपवण्याची ही कृती म्हणजे परिवर्तनाचा मानबिंदू आहे. छत्रपती शाहूंनी केलेले सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग हे आजही इथे घट्ट रुजून आहेत. शहाण्णव कुळी, खानदानी वगैरे बिरुदं लावणारी मंडळी असली, गावात बारा बलुते राहणाऱ्या स्वतंत्र गल्ल्या आणि स्वतंत्र विद्यार्थी वसतिगृहं असली, तरी इथली सामाजिक एकतेची वीण मात्र घट्ट आहे. सार्वजनिक उपक्रमांत सर्वजण एकदिलानं एकत्र येतात. दसऱ्याची ही प्रथा शंभर वर्षांनंतरही अस्तित्वात आहे. दसऱ्याच्या समारंभात दरबारी पोषाख, जोधपुरी, बाराबंदी, तुमान, सुरवार, इराफी विजार अशा पांढऱ्या, मोती रंगाच्या कपड्यावर पगडी किंवा कोल्हापुरी थाटाचा जरीफेटा किंवा लहरी फेटा, त्याचा तुरा आणि शेला ऐटीचं प्रदर्शनही घडतं.
या ऐटीत फेट्याइतकंच महत्त्व आहे ते पायताणांना. कोल्हापुरी चपलेमध्येसुद्धा काही खास प्रकार आहेत ते त्यांच्या बांधणीनुसार. कुरुंदवाडी, कापशी, दोनतळी, तीनतळी, विंचू (करकर वाजणारं) अशा वेगवेगळ्या चपला इथल्या ग्रामीण भागात तयार होतात. जनावरांचं कातडं कमवण्यापासून चप्पल तयार करण्यामध्ये इथले कारागीर वाकबगार आहेत. कारागिरीचा उल्लेख झाला म्हणून सांगितलंच पाहिजे, की इथे सोन्या-चांदीचे दागिने, मूर्तिकाम करणारे कारागीर आपली वैशिष्ट्यं जपणारे आहेत. पण उद्यमनगरमधले पॅटर्नमेकर आणि लहान लहान सुट्या भागांची निर्मिती करणारे कारागीर हे तर देेशातल्या मोठ्या उद्योगांचे खरे आधार आहेत. त्यांच्या कौशल्याला योग्य मोबदला मिळतो की नाही, यापेक्षा अनेक यंत्रांतील महत्त्वाच्या सुट्या भागांच्या निर्मितीचं साधं श्रेयसुद्धा त्यांच्याकडे जात नाही, हा खरा सल आहे. इथल्या गुऱ्हाळघरामधला गुळव्या हासुद्धा दुर्लक्षित राहिलेला. उसाच्या रसापासून गुळापर्यंतच्या सर्व टप्प्यांची देखरेख करायची आणि अचूक वेळेला इंधनाचा ताव कमी करून काहील केव्हा उतरवायची, याचा निर्णय घेणारा हा "टेक्नॉलॉजिस्ट'. साखर कारखान्यातील चीफ केमिस्ट आणि उद्योगाच्या मॅनेजरपेक्षा तसूभरही कमी नसणाऱ्या या कारागिराचा व्यवसाय हा अजून हाय-फाय व्यवस्थापन किंवा इंजिनियरिंग कॉलेजात शिकवत नाहीत. गुळव्या, पॅटर्नमेकर, चांदी-सोन्याची आटणी काढणारा, कातडं कमावणारा, कोल्हापूर-मिरजेत तंतुवाद्यं तयार करण्याबरोबरच त्यातून अचूक सूर-ताल निश्चित करणारा, फेटे बांधणारा, तुतारी वाजवणारा, असे अनेक उपेक्षित कारागीर इथे आहेत आणि हाच इथला मनुष्यबळ आणि कौशल्यांशी निगडित असणारा कणा आहे.
वाद्यांवरून आठवलं. तुतारी वाजवणं हे कोण्या सोम्या-गोम्याला जमणारं नाही. पण इथं ते जोशपूर्ण वातावरण आणि "खच्चून स्वागत' करणारं वाद्य आजही वापरात आहे. इथल्या ग्रामदेवतांशी निगडित असणाऱ्या यात्रांमध्ये नदीचं पाणी देवळाच्या पायऱ्यांवर ओतण्याची आणि नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पण त्या मिरवणुकीत किंवा पीराच्या (पंजे) मिरवणुकीत "पूईई-ढबाक' हे स्पेशल वाद्य वापरलं जातं. ते तालविशिष्ट आहे. "डब-डबडब' असा सततचा ताल आणि अतिशय छोट्या वाद्यातून निघणारा सूर यात असतो. हे अजब वाद्य नाचाची नशा चढवतं. त्याच्याशी डॉल्बी किंवा पाश्चिमात्य संगीत स्पर्धा करू शकत नाही. "जोतिबाची सासनकाठी' नाचवणं आणि कडेपूरचे ताबूत हे इथलं वैशिष्ट्यही पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं आहे. त्यालाही वाद्याची साथ असते. एकूण काय, म्हशींच्या स्पर्धा ते सण, उत्सव, लग्नातला "गुगुळ', लग्नानंतरचा जागर, गोंधळ किंवा यल्लमाचा लिंब या सर्वच ठिकाणी वाद्यांचा मेळ हा इथल्या समाजजीवनाशी झाला आहे.
जसं लहानपणी मारलेल्या उड्यांमुळे इथल्या माणसाचं रंकाळ्यावर प्रेम जडलं आहे. तसंच त्याचं पंचगंगेवरही प्रेम आहे. पोहायला सगळे इथंच शिकतात. याच पाण्यावर इथली समृद्धी. पण त्याबाबत कृतज्ञ आहेत इथली माणसं. कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे शेकडो दिवे नदीच्या घाटावरच्या सगळ्या पायऱ्या, देऊळ आणि दीपमाळेवर प्रज्वलित होतात. संथ पाण्यात त्याचं प्रतिबिंब मावळणाऱ्या चंद्रबिंबासह दिसतं तेव्हा स्वर्ग अवतरतो आणि एरवीही रात्री चिअर्सपासून रश्शावर ताव मारण्याचं हे मैदान असू शकतं.
नदीचा घाट आणि त्या परिसरातील मंदिरं असं सगळं जसं अद्वितीय आहे तशाच आणखी काही बाबी आहेत. कळंब तलावातून कमानीवरून आलेला सायफन पद्धतीचा पाण्याचा पाट आणि पाण्याचा खजिना, रंकाळ्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून सव्वाशे वर्षांपूर्वी बांधलेल्या धुण्याच्या चाव्या, अंबाबाई-विठोबाचं मंदिर, साठमारी, ही ठिकाणं पाहण्यासारखी. इथले पुतळेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण. घोड्याच्या दोन पायांवर उभा राहिलेला ताराराणींचा पुतळा, तसंच इतर अनेक व्यक्तींचे पुतळे इथे आहेत. अगदी "रेड्यांची टक्कर' दाखवणारासुद्धा पुतळा इथे आहे आणि इतिहासाच्या खुणा सांगणारे अनेक स्तंभही! पुतळे बनवण्याची कौशल्यं जपणारे आणि जगणारे पेंटर, रवींद्र मेस्त्री, वडणगेकरांपासून अनेक दिग्गज इथल्या मातीला आकार देणारे. अल्लादिया खॉंसाहेब, गोविंदराव टेंबे, केसरबाई, केशवराव भोसले, मंगेशकर कुटुंबीय, सुरेश वाडकर ते अलीकडच्या पिढीतला अभिजित कोसंबी ही मंडळी शास्त्रीय, नाट्य, सुगम संगीतातली मंडळी; लोकगीताच्या परंपरेतील हैदरसाहेब, शाहीद पिराजीराव सरनाईकापासून शिवशाहीर राजू राऊतासारखी खड्या बोलाची शाहीर मंडळी; वि. स. खांडेकर, रणजित देसाई, सुमती क्षेत्रमाडे, बाबा कदम, राजन गवस असे साहित्यिक आणि जगदीश खेबुडकरांसारखा कविमनाचा माणूस इथंच घडला. एकूण काय, इथं काहीच कमी नाही. खाशाबा जाधवांसारख्या ऑलिम्पिक वीराची परंपरा आजही वीरधवल खाडे, तेजस्विनी सावंत यांच्यासारखी इथली तरुण मुलं टिकवू पाहताहेत.
इथली माणसं स्वत:कडे जरा ताठ मानेनंच बघतात. आपल्याला इंग्रजी येणार नाही आणि बाहेरगावी आपलं जमणार नाही, असा न्यूनगंड त्यांच्यात डोकावतो. दुसऱ्याकडून शहाणपण ते सहज स्वीकारू शकत नाहीत. खरं तर बौद्धिक कुवत असूनही इथल्या माणसावर "खेडवळ' असा शिक्का बसला आहे. इथल्या माणसाला पुण्या-मुंबईचं खास आकर्षण नाही. आणि हो; इथून कुणी नोकरीसाठी बाहेर गेलं तरी ते दोन दिवसांसाठी तरी कोल्हापुराकडे त्यांचे पाय वळतातच. येतानाच प्लॅन होतो. ठरलेले मित्र, ठरलेल्या जागा, ठराविक जेवण! हे वर्षभराचं बॅटरी चार्जिंग असतं. अशी गावाकडे खेचून आणण्याची ताकद इथल्या रश्शात असावी.
गूळ आणि चपलेमुळे कोल्हापूर महाराष्ट्राला-देशाला परिचयाचं झालं, पण कोल्हापूरची उर्वरित महाराष्ट्राशी नाळ मात्र जोडली गेल्याचं दिसत नाही. कोकणाची मुंबईशी जशी नाळ आहे तशी कोल्हापूरची थोडीफार कोकणाशी आहे; पण तसं ते स्वतंत्रच राहिलेलं दिसतं. इथल्या प्रगतीसाठी खमका नेता कोल्हापूरला नाही. राजर्षी शाहूंच्या विकासकामाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यानंतर ठळक असं इथं फारसं घडलं नाही. व्हिजन असणारा नेता नाही हे दुर्दैव. कोल्हापूरबाहेरून आलेली हजारो मंडळी मात्र इथं पाय रोवू शकली. ती एव्हाना कोल्हापूरचीच झालेली आहेत. स्थलांतर होऊन स्थायिक झालेले आता 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोचले आहेत. मात्र इथले फारसे बाहेर जाऊन तिकडचे झाले नाहीत, हे या मातीचं वैशिष्ट्य असावं.
निर्वासित म्हणून आलेले सिंधी, मारवाडी, गुजराथी, कानडी हे इथलेच झाले. लिमलेटच्या गोळ्या विकून जगणारे आता बाजारपेठेचा कणा ठरत आहेत. काल-परवापर्यंतच्या भेळीच्या गाड्यांशेजारी आज चायनीज, मेवाड कुल्फी, पाणीपुरी, कच्छी दाबेली, दावणगिरी डोसा, केरळी शहाळी यांच्या तांबड्या गाड्यांनी गर्दी केली आहे. इथली भेळ, मिसळ, उसाचा रस, आइस्क्रीम मात्र तिथंच राहिलं आहे. इथल्या तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय करायचा आहे, पण आपलं गाव सोडून नाही. गावातच किंवा अगदी घराजवळ व्यवसाय किंवा नोकरी मिळावी, अशी मानसिकता त्यांना बाहेर जाऊच देत नाही. वडिलोपार्जित घराच्या वाटण्या करत करत ती लहान होताहेत. शिक्षणाच्या अभावामुळे रिक्षा, टेंपो, पानाची टपरी इतकीच त्यांची उडी मर्यादित राहते आहे.
खरं तर या गावाला साहित्यिक, गायक, कवी, कारागीर, तंत्रज्ञ अशी मोठी परंपरा आहे, पण ती म्हणावी तितकी फोफावली नाही. याची कारणंही गुलदस्त्यात आहेत. आजही इथल्या प्रतिभेची पुसटशी जाणीव होते. क्षणभंगुर आनंदात हे सारं संपून जातं. तरी आपुलकी जपणारी, माणुसकी जपणारी इथली अघळपघळ माणसं मात्र ताठ आहेत हे नक्की!

......


मुद्दागुद्दी!

गुद्दागुद्दी’ हा शब्द आपण ऐकलाय.. ही मुद्दागुद्दी काय आहे? तर, मुद्दागुद्दी म्हणजे भांडण सुरू करायचं मुद्यावरून आणि संपवायचं गुद्दागुद्दीवर! आपण साधं नळावरचं भांडण घेऊया.. वाद होतो सुरू.. का? कारण मध्येच कोणीतरी घुसलेलं असतं. हा मूळ मुद्दा. पण ह्यावरून जी ’बाच्याबाची’ सुरू होते की बस रे बस.. पार चारित्र्यहननच!! त्या अवधीत सहज पन्नास लोक बादल्या भरून जातात.. सो, मुद्दा राहतो बाजूला.. उगाच एकमेकांची उणीदुणी काढायची, पार वाडवडीलांच्या कुळाचा उद्धार करायचा, पोराबाळांचं अपयश उगाळायचं, कधीतरी पाच वर्षापूर्वी झालेल्या एकमेकांच्या चुका उकरून काढायच्या... आणि शेवटी बोलायला काही उरलं नाही की हात उगारायचा!! मूळ मुद्द्यातलं पाणी एव्हाना येऊन गेलेलं असतं बिचारं.. पुढच्यामागच्या लायनीतल्या लोकांचं पाणीही भरून झालेलं असतं आणि ते भरता भरता टीपीही बरा झालेला असतो.. भांडणारे बसतात उद्यापर्यंत बोंबलत! (खरंच!!) (आता लोक सूज्ञ झालेत.. पाणी ठरलेल्या वेळात जातं हे ठाऊक झालंय, त्यामुळे ते गेलं की मग भांडतात! भांडण सोडायचं नाही- त्या मुद्द्याला मात्र चिकटून आहेत!)

नळावरचं भांडण मेटॅफॉरिकली घेऊया.. अशी अनेक उदाहरणं सगळीकडे दिसतात.. बस/लोकल/रांगेत घुसणारी माणसं- तेवढ्यापुरतं सोडून देतो का आपण? घुसणारा माणूस मागे गेला तरी त्याच्याकडे डेडली कटाक्ष, ’नकोच मिळूदे त्याला तिकिट’ सारख्या इच्छा.. आपण तरी कुठे लिमिट पाळतो? डोक्यात एकदा रक्त उसळलं की उतरायचं नाव घेत नाही लवकर.. मग उगाच खुसपटं काढत रहायची काही ना काही.. अशाने मग समोरच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? का त्याने केली ती चूक? आणि आपण करतो तो शहाणपणा?

हीच गम्मत लहान मुलांच्या भांडणात पडणार्‍या पालकांची.. मुलं एकमेकांशी भांडतात आणि त्याच्या तक्रारी पालकांपर्यंत पोचतात.. मग मुलांचं भांडण रहातं बाजूला आणि खेळ रंगतो पालकांचाच! ’तुझ्या पोराकडून काय अपेक्षा करणार रे! बापच असा, तर तो तरी काय करणार? खानदानाची सवय!’ ’आई घरात मुलाला काही शिकवेल तर मूल धड वागेल ना? संस्कारच नाहीत ह्यांना काही! आमच्या लोकॅलिटीत अगदी शोभत नाहीत!’ वगैरे वगैरे! पार इज्जत के फालुदे- दोन्ही बाजू एकमेकांच्या करतात.. त्यांचं भांडण संपेस्तोवर पोरांनी आपसातलं भांडण मिटवून पुढच्या भांडणाची तयारी केलेली असते! मुलांचं एकेकाळी भांडण झालं होतं म्हणून वर्षानुवर्ष एकमेकांचं तोंड न पाहिलेले पालक मला ठाऊक आहेत! नको त्या वेळी नको त्या गोष्टींचा बादरायण संबंध लावून आयुष्यभराचं एकमेकांसमोर हसं करून घेतात हे लोक.. त्याऐवजी पोरांच्या भांडणात न पडण्याचा सूज्ञणा वेळीच दाखवला असता तर??

आणि आंतरजालावरच्या भांडणाचं तर काय सांगावं! ही तर भांडण उकरून काढण्याची एक आयतीच सोय झालीये! इथे आपण एकमेकांना दिसत नाही, भेटायची शक्यता नाही! समोरासमोर असू, तर कसं भांडण करायच्या आधी थोडा तरी सारासार विचार करायला वेळ असतो.. आंतरजालावर भीतीच नाही कशाची! जे मनात आलं, लिहून टाकलं.. त्याचा आणि लिहिलेल्या मुद्द्याचा काहीच संबंध नसतो.. काढायची असते ती चिडचिड बाहेर.. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडून ’तुझ्याकडून बाकी काय अपेक्षा करणार म्हणा, तुला विचारण्यातच काही अर्थ नाही’ अशी वाक्य पडतात.. अजून एक अचाट प्रकार म्हणजे आंतरजालावरच्या मराठी संकेतस्थळावर दोन तथाकथित मित्र असतात. ते एकमेकांना नुस्त्या आयडीनेच नाही, तर थोडेफार पर्सनलीही ओळखत असतात.. त्यातल्या एकाला दुसर्‍याचं काहीतरी पटत नसतं.. पण ते तो त्याला मोकळेपणाने नाही सांगत.. तो काय करतो? ते सांगण्यासाठी अजून एक आयडेंटीटी निर्माण करतो.. आणि त्या आयडीने पहिल्या त्याच्या सोकॉल्ड मित्रावर वाट्टेल ते शरसंधान करतो.. वरताण म्हणून त्याच्या परिचित आयडीने मित्राला सहानुभूतीही देतो -’काय लोक तुला सतावतात ना?’ म्हणून!!!! म्हणजे एकच व्यक्ती त्रास देते, आणि खांद्यावर हातही ठेवते! विकृत लोक असतात हे, जाऊदे..

तर, मुद्दा असा होता, की तुम्हाला मुद्दा पटत नाही की माणूस पटत नाही? प्रत्येकाचं प्रत्येकाशी घट्ट कसं जमेल? प्रत्येक न प्रत्येक मत कसं जुळेल? थोडे मतभेद, मतांतरे असणारच.. आणि मैत्री जर तितकीच मोकळी असेल तर ती आमनेसामने कळवावीत.. त्यात कोणीच वाईट वाटून घ्यायचे किंवा ईगो प्रॉब्लेम करण्याचे काय कारण? मतभेद आहेत ते व्यक्त करण्याच्याही रीती आहेत, संकेत आहेत.. ते व्यक्त करावेत, समोरच्याचं ऐकून घ्यावं- त्याने आपली स्वत:ची मतंही तपासून होतात आणि विषय संपवावा.. पण तसं होत नाही.. एकदा रसवंती वाहू लागली, की कायकाय जुनंपानं बादरायण संबंध लावूनही न जुळणारं असं काहीतरी बोलण्याबोलण्यातून बाहेर पडतं आणि मतभेदाचे वाद आणि वादाचं भांडण होऊन संबंध मात्र चिघळतात.. आणि एकदा हे संबंध बिघडले की मात्र ते सांधूनही सांधत नाहीत..

मतभेदांच्याही पुढे जाऊन मैत्री करता येते- हे ज्यांना कळले ते खरे सुखी.. इन्ग्रजीमध्ये दोन सुप्रसिद्ध वाक्य आहेत- A friend is the one who knows everything about you and still loves you आणि We may agree to disagree! वकीलांचे तसे असते म्हणतात- कोर्टात जे वकील एकमेकांसमोर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात, तेच संध्याकाळी एकत्र गप्पा मारताना दिसतील. अशीलातर्फे भांडण हा त्यांच्या व्यवसाय आहे.. एकमेकांशी भांडण असायलाच पाहिजे असं नाही!

पण मुद्द्यावरून गुद्द्यावर घसरलं की समजायचं आता सगळं संपलं.. कदाचित एरवी काही तोडगा निघूही शकला असता, पण गुद्दागुद्दी आली- मग ती शारीरिक असो वा शाब्दिक की कोणालाच सारासार विचार रहात नाही, आणि मुद्दे बासनात गुंडाळून पडतात. तर पुन्हा एकदा मुद्दा असा, की मुद्दा सोडू नका, शेवटी प्रश्न तत्त्वाचा आहे! पण तो प्रतिष्ठेचाही करणं इतकं आवश्यक आहे का याच्या विचार करूया.. सौहार्द्राचे अनेक मार्ग खुले असताना कशाला ह्या मुद्दागुद्दीत परस्परमैत्रीला चूड लावायची? 
......

अक्षरवार्ता

मायबोली मराठी भाषेवर समस्त मराठी लोकांचे अतिशय प्रेम. कितीही वाद त्यामध्ये आले, ओरड झाली, की 'मराठीला घरघर लागली', तरी सध्याचे मराठी पुस्तकांच्या विक्रीचे आणि लोकप्रियतेचे आकडे बघता, मायबोलीच्या जीवात जीव नक्कीच आला असेल. भाषेचा विस्तार जितका बोलण्यामधून होतो, तितकीच भाषेची समृद्धी ही त्या भाषेच्या साहित्याच्या प्रसारामधून होते. आपल्या मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्यकृतींची परंपरा फार जुनी. एकाहून एक सरस लेखक आणि कवी आपल्याला मिळाले आणि त्यांनी पुस्तकांच्या माध्यमामधून मराठी माणसाची वाचनाची भूक शमवली, तृप्त केली.

मध्यंतरीच्या काळात 'सकस, दर्जेदार असं काही हल्ली वाचायलाच मिळत नाही' अशी तक्रार वारंवार ऐकू येत असे.'ई-बूक' ही संकल्पनाही रूढ होऊ पहात होती. पण कालांतराने 'हातात पुस्तक घेऊन, कोर्‍या पानाचा वास अनुभवत पुस्तक वाचण्यात' जी मजा आहे, ती ई-बूकमध्ये नाही, हे पुस्तकप्रेमींना उमजले. मराठी पुस्तक हातात घेऊन वाचणे हेही 'ओल्ड-फॅशन्ड' राहिले नाही.

आता हळूहळू दिवस बदलत आहेत. एखादं पुस्तक एखाद्याने वाचलं नसेल तर 'अजूऽऽऽन हे पुस्तक वाचलं नाहीस???' असे विचारून त्याच्या हातात ते पुस्तक द्यायचे दिवस आहेत हे. अनेक विषयांवरची, अनेक जुन्या-नव्या, प्रस्थापित-नवोदित लेखकांची पुस्तकं पुन्हा बाजारात येत आहेत, आणि तूफान खपतही आहेत! पुस्तक प्रदर्शनांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहेत!! मराठी लेखकांना, प्रकाशकांना याहून दिलाश्याची आणि आनंदाची बाब कोणती असेल? जुनी, जुन्या काळची पुस्तकं अजूनही जोमाने पंचविसावी, तिसावी आवृत्तीरूपात खपतात, तर प्रसंगोचित एखाद्या कवीचे, लेखकाचे पुस्तक पुन्हा नवीन स्वरूपात उपलब्ध आहे, म्हणून उत्सुकतेने घेतले जाते. नवीन वाचकवर्ग तयार होत असतो, जोही या पुस्तकांचा गुणग्राहक असतो. एकंदर, मराठी पुस्तकांना सतत मागणी आहे.

एखादा माणूस जर खरा पुस्तकप्रेमी असेल, तर त्याची ही वाचनभूक दिवसागणिक वाढतच जाते. मग होतं काय, की कधीतरी एक 'वाचन ब्लॉक' येतो. खूप पुस्तकं वाचली, तरी 'जबरदस्त', 'झपाटून टाकणारे', 'स्फूर्तीदायक' असे पुस्तक अनेक दिवसात वाचलेलं नसतं. कोणतं पुस्तक वाचलं, की 'ती स्फूर्ती' मिळेल, 'तो मूड' येईल हे कोणताच वाचक सांगू शकणार नाही म्हणा, कारण एकेक पुस्तक वाचायचे देखील 'दिवस' असतात. एकेकाळी ज्या पुस्तकाची पारायणं केली, ते आता हातातही धरवत नाही, तर एखादं पुस्तक आपण या आधी का नाही वाचलं ही चुटपुट कायम लागून रहाते. अनेक वेळेला हे समजत नाही की 'आता यानंतर कोणतं पुस्तक वाचावं?' पुष्कळदा मित्र, नातेवाईक यांनी सुचवलेली पुस्तकं आपल्या 'टाईपची' नसतात. एखादं पुस्तक अगदी उत्सुकतेने हातात घ्यावं आणि घोर अपेक्षाभंग व्हावा, हे तर आपण सगळ्यांनी किमान एकदा तरी अनुभवलं असेलच.

अशा वेळी, कोणी एखाद्या पुस्तकाचा 'स्नीक प्रीव्ह्यू' आपल्याला दिला, त्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी त्यात थोडं डोकावू दिलं, तर काय मजा येईल ना? असाच एक उपक्रम सध्या 'मायबोली' या मराठी संकेतस्थळावर सध्या चालू आहे- 'अक्षरवार्ता!'. डॉ. चिन्मय दामले हे हा उपक्रम चालवत आहेत. 'समकालीन', 'ग्रंथाली' 'राजहंस' इत्यादी या आघाडीच्या प्रकाशन संस्थांच्या नवीन पुस्तकांविषयी ते या उपक्रमाअंतर्गत माहिती करून देतात. थोडंसं पुस्तकाविषयी प्रास्ताविक, आणि चक्क पुस्तकामधली काही पानंही ते आपल्याला वाचायला देतात. यातलं पुस्तकांचं वैविध्य वाखाणण्याजोगं आहे.. अगदी आत्ताच आलेल्या डॉ. प्रकाश आमटेंचं 'प्रकाशवाटा', कै. विजय तेंडुलकर यांच्या जयंतीला प्रकाशित झालेलं, ''तें' दिवस', , गानसरस्वती किशोरी आमोणकरांचा सांगितिक प्रवास- 'स्वरार्थरमणी रागरससिद्धांत', 'अमूल'कर्ते श्री. वर्गीस कुरियन यांचं 'स्वप्नं' अशी नामांकित व्यक्तिमत्त्वांच्या पुस्तकांची ओळख आपल्याला या उपक्रमात झालेली आहे, आणि यापुढेही होत राहील. विशेष म्हणजे, ही सर्व पुस्तकं मायबोलीच्या 'खरेदी विभागातही' उपलब्ध आहेत.

जगभर पसरलेल्या मराठी वाचकापर्यंत नवीन आणि उत्तम पुस्तकं पोचावीत, यासाठी डॉ. चिन्मय मनापासून प्रयत्न करत आहेत, याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार. या उपक्रमाचे यश आपल्याही हाती आहे. ही पुस्तकं पाहून, आपल्याला वाचावीशी वाटली, तर अवश्य ती विकत घेऊया, आणि एक उत्तम वाचनीय अनुभव आपल्या शिदोरीत जमा करूया. 
 ......
एक लघु कथा
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.

......


वाजवा रे वाजवा

बहीणा बाईंची अरे संसार संसार ही कविता आपल्याला फार म्हणजे फारच आवडते. नी संसारात पडल्या पसून तर भावायलाही लागली आहे. खरं म्हणजे मी लहानपणीच लग्न करणार नाही असं ठरवलं होतं. पण प्रेमाची परिणती लग्नातच व्हावी असा हिचा आग्रह, बाबांचं मत, आईचा हुकूम, हिच्या टोणग्या भावाचा नी त्याचा बाप शोभेल अशा बापाचा 'प्रेमळ सल्ला', ह्या सगळ्याला बळी पडून शेवटी आमचेही दोनाचे चार झालेच. प्रेम विवाह असला तरी बघण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे असा आजीचा आग्रह होता. ह्याच कार्यक्रमात देणं घेणं, मान पान, साखरपुडा, कार्यालय इत्यादी ची बोलणीही करून घेऊ असं बाबा म्हणाले. मला कुणी काही विचारलंच नाही.

ठरल्या दिवशी मी, आई, बाबा आणि आजी असे जाऊन पोचलो. एका कोचावर आम्ही नी समोरच्या कोचावर तिचे बाबा, आई, दादा, ती आणि पायाशी एक कुत्रं असे दोन संघ (मनातल्या मनात) कबड्डी कबड्डी म्हणत स्थानापन्न झालो.

बसल्या पासून पाचच मिनिटात ही मंडळी आपल्या मुलाला नकार देतील ह्या भितीने आमच्या बाबांनी 'आम्हाला मुलगी पसंत आहे' असं सांगून टाकलं नी आजी समोरच्या समोशांवर तुटून पडली. त्यावर तिच्या वडिलांनी 'आता आमच्या मुलीनं ठरवलंच आहे तर आम्ही काय बोलणार' असे भाव चेहऱ्यावर आणून 'आम्हालाही मुलगा पसंत आहे' असं सांगितलं. 'तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा' हिची आई. मी आपलं विचारलं 'काल सिनेमाला का आली नाहीस?' त्यावर सगळे स्तब्ध. ही लाजून आत पळाली नी आतून मला 'तुझ्या नानाची टांग' असा sms पाठवला. द्यायचे घ्यायचे काहीच नसल्याने आणि आप-आपल्या मंडळींचे मान-पान आपणंच करायचे असल्याने समोसे संपताच आमची बैठकही संपली.

ह्या बैठकीत मी एक नोट केले की मुली कडच्यांपेक्षा आमच्या कडची मंडळीच जास्त टेन्शन मध्ये होती. काही मित्रांशी बोलल्यावर ही सार्वजनिक समस्या असल्याचा साक्षात्कार झाला. संध्याकाळी कट्ट्यावर ह्या समस्येची उकल करायची असं ठरलं. पण बऱ्याच सिगारेटी आणि लीटरचे लीटर चहा संपूनही हाती काही लागेन. शेवटी 'साला, कलियुग कलियुग म्हणतात ते हेच' असा निष्कर्ष काढून आम्ही आपापल्या घरी गेलो.

यथावकाश आमचे लग्नं झाले. कन्यादान करते वेळी सासर्‍याच्या चेहेर्‍यावरचा आसुरी आनंद, सासू च्या चेहेर्‍या वरचे कुत्सित हास्य आणि साल्याच्या चेहेर्‍यावरचे 'सुटलो' हे भाव बघताच मला एकदम रामदास स्वामीच आठवले.ते बोहल्यावरून का पळाले असावेत ह्याचं कारण मला सापडलं असं वाटून मलाही हसू फुटलं. ते पाहून हिचा बाप चमकला. गोरा मोरा झाला. पण उसनं हसून त्याने माझ्या बाबांना पान सुपारी दिली. (सुपारी देणं हा वाक्प्रचार इथूनच आला असेल काय?)

एकी कडे तारा बलं चंद्र बलं सुरू असताना मी मनातल्या मनात भीमरूपी महारुद्रा म्हणत होतो. सप्तपदी घालताना मी हिला हात धरून चालवतोय ह्या ऐवजी हीच मला मागून पराणी टोचून पुढे ढकलतेय असा भासही मला झाला. वर आमची नालायक मित्र मंडळी आमच्या समोरच प्लेट च्या प्लेट आइसक्रीम चापत होती. त्यांचं लग्नं नसल्याने ते बिनधास्त होते.

घटका भरत असताना हिच्या एका मावशीने यमक प्रास काहीही नसलेली मंगलाष्टकं म्हटली. त्यात हिचं यथेच्छ गुणवर्णन केलं होतं. आपली बायको इतकी गुणी आहे हे ऐकून मला अभिमान वाटला. पण मागच्या दोन वर्षात ह्यातल्या एकही गुण आपल्याला कसा नाही कळला हा विचार मनात येऊन मी थोडा गोंधळातही पडलो. त्यांचं म्हणून झाल्यावर, घटका भरत नसल्याने व जवळचा स्त्रोत्र व सुभाषितांचा साठा संपल्याने गुरुजींनी मध्येच रामरक्षेतले दोन-चार श्लोकही म्हणून घेतले. आणि कुणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच घटिका पात्राला एक तांदूळ फेकून मारला. मी सहज मान वळवून पाहिलं तर दुसरे गुरुजी शांत पणे एका कोपऱ्यात तंबाखू चोळत उभे होते व 'सावधान' च्या वेळी कोरस देत होते.

शेवटी एकदाची घटका भरली नी लोकांनी आमच्या वर रंगीत तांदूळ फेकून टाळ्या वाजवल्या. डोंबाऱ्याच्या खेळात जसं माकड जिवाच्या आकांतानं कोलांट्या उड्या मारतं नी लोकं टाळ्या वाजवतात त्यातलाच हा प्रकार. (इथे पुन्हा मला मी कोलांट्या उड्या मारतोय नी ही डमरू वाजवतेय असा भास झाला).

तर अशा प्रकारे आमचं वाजवा रे वाजवा झालं. आणि नव्याची नवलाई संपल्यावर, वाट चुकलेलं वासरू जसं थोड्या वेळानं कळपात सामील होतं, तसे आम्हीही आमच्या कट्ट्यावरच्या कळपात सामील झालो.

......

आवडती शीर्षक गीते



पूर्वी दूरदर्शनवरच्या मालिका॑ची शीर्षक-गीतेसुद्धा तेव्हढीच लोकप्रिय होत असत. एकतर एकच एक चॅनेल होता व काही मालिका खरोखरच दर्जेदार होत्या. आत्ताच्या सगळ्याच मालिका एकदम फालतू आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही पण रविवार सकाळी रामायण- महाभारताच्या वेळी रस्त्या॑वर अक्षरशः शुकशुकाट असायचा तसा आता 'क्यो॑ कि..' ला होत नाही हे खरे आहे.
अश्या मालिका॑ची शीर्षकगीतेही मनावर खोल ठसा उमटवत असत. मालिकेच्या विषयाला अनुसरून तसे चित्रण व पार्श्वगायन अथवा स॑गीत असेल तर अचूक परिणाम साधला जायचा. नेमक॑ उदाहरण म्हणजे 'उडान' मालिका व त्याच॑ टायटल. एक लहान मुलगी पि॑जर्‍यातन॑ पक्षी बाहेर काढते व तो मोकळ्या आकाशात भरारी घेतो व पार्श्वभूमीला नगार्‍यासारख॑ वाद्य वाजून ग्रूप व्हायलिन्स वाजतात. अतिशय परिणामकारक टायटल होत॑ ते. तसेच मराठीतील 'आव्हान' मालिकेच्या टायटल मध्ये पडद्यावर आग दाखविली होती व मागे 'आव्हान फुले आव्हान, नारीला समजून अबला, छळ आजवरी जो झाला, नाव ना त्याचे उरेल आता, सुटले धु॑द तूफान..' अश्या ओळी कोरस सोबत उत्तरा केळकरा॑नी म्हटल्या होत्या. वास्तविक आव्हान सिरियल एक रिपिटेशनच होत॑. जयव॑त दळवीनी॑ हु॑डाबळी ह्या विषयावर एक सिनेमा (पुढच॑ पाऊल) व एक नाटकही लिहिल॑ होत॑. (त्या॑चे मित्र त्या॑ना 'दळवी॑नी तीनदा हु॑डा उपटला' असे चिडवित असत म्हणे) पण तरी टिव्ही मालिकाही गाजली. शीर्षकगीतही गाजल॑.
मालिका गाजण्यामागे कथा, पटकथा, कलाकार, दिग्दर्शन हे असतातच पण शीर्षकगीत व पार्श्वस॑गीताचाही

वाटा मोलाचा असतो असे मला वाटते. मला आठवते आहे, श्रीधर फडकेच्या प्रत्येक लाईव्ह कार्यक्रमा॑मध्ये ते॑व्हा गाजत असलेल्या 'स॑स्कार' मालिकेचे 'मना घडवी स॑स्कार' हे टायटल गाणे म्हणायची त्या॑ना फर्माईश होत असे. इतकेच काय, भिकाजीराव करोडपती ह्या बर्‍यापैकी फालतू मालिकेचे शीर्षकगीतही लोका॑ना खूप आवडायचे व त्यागराज खाडीलकरला शो'मध्ये ते म्हणण्याची जोरदार फर्माईश व्हायची. (तो थोडा वैतागायचाही)
काही गीते मी कॅसेटवर मुद्रीत करून ठेवत असे. पुढे इ॑टरनेटवर त्यातली काही mp3 format मध्ये सापडलीही.

मला खालील मालिका व विशेषकरून त्या॑ची शीर्षकगीते खूप आवडायची. मिपाकरा॑ना कुठली आवडतात व कुठली त्या॑च्याकडे आहेत, कृपया शेअर करावीत.

गोट्या: बीज अ॑कुरे अ॑कुरे
आव्हानः आव्हान फुले आव्हान
ब॑दिनी: स्त्री ही ब॑दिनी
स॑स्कारः मना घडवी स॑स्कार
रानजाई: दर्‍याखोर्‍यात फुलते तू ग रानजाई
ब्योमकेश बक्षी
ज॑गलबुक- ज॑गल ज॑गल बात चली है
ऍलिस इन वन्डरलॅन्डः टप टप टोपी टोपी
डक टेल्स
आभाळमाया: उरे तोच र॑ग
बुनियाद
जबान स॑भालके
तमस (नीटसे आठवत नाही पण छान असावे)
मु॑गेरीलाल के हसीन सपने
विक्रम और वेतालः (चक्क केदार रागातले स॑गीत वापरले होते व वेताल' ह्या शब्दावर आलापीही होती. Smile)
एक शून्य शून्य (हे म्युझिक खरोखर॑च अ॑गावर काटा आणायचे!)
किले का रहस्य (हेही टेरर होत॑)
प्रतिभा आणि प्रतिमा (रविवार सकाळी सनईच्या सुरातले हे म्युझिक खूप आवडायचे)

......

भारतीय रुपयाला अखेर बोधचिन्ह मिळाले

भारतीय रुपयासाठी प्रतीकचिन्ह तयार करण्यात आले आहे. डी.उदयकुमार या आय टी आयच्या विद्यार्थ्याने केलेल्या रेखांकनाची यासाठी निवड करण्यात आली. या प्रतीकचिन्हाच्या वापराने,भारतीय रुपयाला जागतीक अर्थव्यवस्थेत नवा आयाम मिळणार आहे.दिनांक १५ जुलै २०१० रोजी झालेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजूरी देण्यात आली.आयएसओ-आयईसी १०६४६ व आयएस १३१९४ याअंतर्गत युनिकोडीत केल्यावर हे प्रतीकचिन्ह आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारासाठी उपयोगात आणल्या जाईल.या एन्कोडींग  नंतर ईलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये यास स्थान दिले जाईल

 ...... 

पु.ल. देशपांडे यांचे किस्से



1)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".
2)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .
3)
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असरणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"
4)
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद
" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."
5)
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.
त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.
6)
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".
ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"
7)
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."
8)
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"
9)
माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"
10)
कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.
11)
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"
12)
अलीकडे मुंबईत पडलेल्या प्रलयंकारी पावसाच्या दिवशी एन.सी.पी.ए मधून 'वराती' ची तालीम आटोपुन मी माझी मेत्रिण मीना फडके, कमरेऎवढ्या साचलेल्या पाण्यातूण चिबं भिजून माझ्यागरी पोहचलो. मीनाला त्या रात्री माझ गाऊन घालून माझ्याचकडे रात्र घालवावी लागली. ही गोष्ट मी सगळ्यांना ऎकवली होती. भाईच्याही ती कानावर गेली. त्यावर ते म्हणाले, 'तरीच परवा यशवंत देवांना कुणीतरी म्हणाले. की गाऊन दाखवा.' तर नीला म्हणाली, 'बरोबर आणला नाही'
13)
नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'
14)
हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'
15)
साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.
16)
कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.
16)
'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.
17)
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!
18)
एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"
19)
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"
20)
एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"
21)
पु.लं. चा वाढदीवस होता,
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचन्दाचा हार घातला.
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?
पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"
घरात हशा पिकला होता !
22)
एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की
माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.
तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"
23)
पुलंचे मित्र रंगाराव दिसायला अगदी बेताचे, काळे अन चक्क चकणे.
पण एकदा त्यांच्या मुलीला पहिल्यावर ते म्हणाले,
"रंग्याची मुलगी भलतीच सुस्वरूप निघाली.
वाटते ही मुलगी बापाचा डोळा चुकवून(!) जन्माला आली असावी."
24)
एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"
25)
डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.
"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."
26)
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"
27)
आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस."
28)
भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"
29)
पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?
30)
पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.
31)
एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"
32)
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"
33)
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
34)
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.
35)
एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'


......

चितळे मास्तर:पुल

एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईंपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत. "कार्टे चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे, ते त्यांच्या हाती सुखरूप आहे." अशी ठाम समजूत असे. "एके काळी असे" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकऱ्यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डावरदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन्सिपॉल व्हावे लागले होते, पण पंधरा दिवसांतच मास्तर त्या खुर्चीला वैतागून पुन्हा आपले 'चितळे मास्तर' झाले. त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान असलेले काळे मास्तर हे प्रिन्सिपॉल झाले आणि अजूनही आहेत.

डाव्या हातात धोतर, एके काळी निळ्या रंगाचा असावा अशी शंका उत्पन्न करणारा खादीचा डगला, डोक्याला ईशान्य-नैऋत्य दाखवणारी काळी टोपीबाहेर टकलाच्या आसपास टिकून राहीलेले केस आले आहेत, नाक आणि मिश्यांनी ठेवण राम गणेश गडकऱ्यांसारखी, पायांतल्या वहाणा आदल्या दिवशी शाळेत विसरून गेले नसले तर पायांत आहेत, डावा हात धोतराचा सोगा पकडण्यात गुंतलेला असल्यामुळे उजव्या हाताची तर्जनी खांद्याच्या बाजूला आपण एक हा आकडा दाखवताना नाचवतो तशी नाचवीत चितळे मास्तरांनी स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतचा तो लांबसडक रस्ता गेली तीस वर्षे तुडवला.

त्यांनी मला शिकवले, माझ्या काकांना शिकवले, आणी आता माझ्या पुतण्यांना शिकवताहेत. आमच्या गावातल्या शंकराच्या देवळातला धर्मलिंग गुरव आणि चितळे मास्तर यांना एकच वर्णन लागू-- नैनं छिन्दन्ति शस्रणि नैनं दहति पावकः! त्यांनी पहिले महायुद्ध पाहिले, दुसरे पाहिले आणि आता कदाचित तिसरेही पाहतील.

अजूनही गावी गेलो तर मी शंकराच्या देवळात जातो आणि तिथला धर्मलिंग गुरव "पुर्ष्या, शिंच्या राहणार आहेस चार दिवस की परत पळायची घाई?" असेच माझे स्वागत करतो. मला "पुर्ष्या" म्हणणारे दुसरे गृहस्थ म्हणजे चितळे मास्तर! धर्मलिंगाला नुसते पुर्ष्या म्हणून परवडत नाही. "पुर्ष्या शिंच्या" म्हटल्याखेरीज तो मलाच उद्देशून बोलतो आहे हे कदाचित मला कळणार नाही अशी त्याची समजूत असावी. काही वर्षांपूर्वी गावकरी मंडळींनी मी परदेशात जाऊन आलो म्हणून माझा सत्कार केला होता. समारंभ संपल्यावर धर्मलिंग गुरव कंदील वर करीत माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला, "पुर्ष्या, शिंच्या इंग्लंडात काय हवाबिवा भरून घेतलीस काय अंगात? फुगलायस काय!" धर्मलिंगाच्या या सलगीने गावातली नवी पिढी जरा बिचकली होती. आणि चितळे मास्तर माझी पाठ थोपटून म्हणाले होते, "पुर्ष्या, नाव राखलंस हो शाळेचं! वेस्टमिन्स्टर ब्रिज पहाटेच्या वेळी जाऊन पाह्यलास का रे? वर्डस्वर्थची कविता आठवतेय ना? अर्थ हॅज नॉट एनीथंग टू शो मोअर फेअर--डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय-- ए साइट सो टचिंग इन इटस...?"

"मॅजेस्टी!" मी शाळेतल्या जुन्या सवयीला स्मरून म्हणालो.
"मॅजेस्टी~~! बरोबर!" चितळे मास्तरांची ही सवय अजून टिकून होती. ते वाक्यातला शेवटला शब्द मुलांकडुन वदवीत. मला त्यांचा ईंग्रजीचा वर्ग आठवला.

"...टेक हर अप टेंडर्ली, लिफ्ट हर विथ केअर --- फॅशनड सो स्लेंडर्ली यंग ऍंड सो....?"

"फेअर!" सगळी मुले कोरसात ओरडायची.

इंग्रजी पहिलीत आल्यापासून मॅट्रिकपर्यंत सात वर्षे चितळे मास्तरांनी मला अनेक विषय शिकवले. त्यांच्या मुख्य विषय इंग्रजी. पण ड्रॉइंग आणि ड्रिल सोडुन ते कुठलाही विषय शिकवीत. फक्त तासाची घंटा आणि वेळापत्रक ह्या दोन गोष्टींशी त्यांचे कधीच जमले नाही. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक ही चैन त्या काळात आमच्या हायस्कूलला परवडण्यासारखी नव्हती. आठदहा शिक्षक सारी शाळा सांभाळायचे. आता शाळा पावसात नदी फुगते तशी फुगले आहे. भली मोठी इमारत, एकेका वर्गाच्या आठ आठ तुकड्या, सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट, दोन दोन हजार मुले वगैरे प्रकार माझ्या लहानपणी नव्हते. हल्ली मुलांना मास्तरांची नावे ठाऊक नसतात. माझ्या मास्तरांना शाळेतल्या सगळ्या मुलांची संपुर्ण नावे पाठ! पायांत चपला घालून येणारा मुलगा हा फक्त गावातल्या मामलेदाराचा किंवा डॉक्टराचा असे! एरवी मॅट्रिकपर्यंत पोंरानी आणि चितळे मास्तरांसारख्या मास्तरांनी देखील शाळेचा रस्ता अनवाणीच तुडवला. शाळेतल्या अधिक हुषार आणि अधिक 'ढ' मुलांना मास्तर घरी बोलावून फुकट शिकवायचे. "कुमार अशोक हा गणितात योग्य प्रगती दाखवीत नाही, त्याला स्पेशल शिकवणी ठेवावी लागेल."

असल्या चिठ्या पालकांना येत नसत. पोर नापास होणे हा मास्तरांच्या 'माथ्या आळ लागे' अशी शिक्षकांची भावना होती. 'छ्डी' ही शाळेत फळा आणि खडू यांच्याइतकीच आवश्यक वस्तू होती.

चितळे मास्तरांनी मात्र आपल्या तीस-बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत छ्डी कधीच वापरली नसावी. त्यांच्या जिभेचे वळणच इतके तिरके होते की, तो मार पुष्कळ होई. फार रागावले की आंगठ्याने पोरांचे खांदे दाबत.

संध्याकाळी शाळा सुटल्यावर चितळे मास्तरांचा अवतार पाहण्यासारखा असे. फळ्यावरच्या खडूची धूळ उडून उडून पिठाच्या गिरणीत नोकरीला असल्यासारखे दिसत. तरीही शिक्षणकार्य संपलेले नसे. संध्याकाळी त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'मागासलेल्या जमातीचे' वर्ग चालायचे.

चितळे मास्तरांचा वर्गात वापरण्याचा शब्दकोश अगदी स्वतंत्र होता. पहिला तास इंग्रजीचा म्हणून आम्ही नेल्सनसाहेबाचे अगर तर्खडकरांचे पुस्तक उघडून तयारीत राहावे तर मास्तर हातात जगाचा नकाशा बंदुकीसारख्या खांद्यावर घेऊन शिरत. मग वर्गात खसखस पिके. मास्तर "अभ्यंकर, आपटॆ, बागवे, चित्रे" करीत हजेरी घेऊ लागायचे. तेवढ्यात शाळेच्या घंटेइतकाच जुना असलेला घंटा बडवणारा दामू शिपाई पृथ्वीचा गोल आणून टेबलावर ठेवी. चितळे मास्तर त्याला तो सगळी पृथ्वी हातावर उचलतो म्हणून 'हर्क्यूलस' म्हणत. हजेरी संपली की पुढल्या बाकावरच्या एखाद्या स्कॉलर मुलाला उद्देशून मास्तर विचारीत, "हं बृहस्पती, गेल्या तासाला कुठं आलो होतो?"

"सर. इंग्लिशचा तास आहे."

"ऍ? मग भूगोलाचा तास केव्हा आहे?"

"तिसरा."

"मग तिसऱ्या तासाला तर्खडकराचं श्राद्ध करू या. भूगोलाची पुस्तकं काढा!"

ही पुस्तके तासाला काढण्यात काही अर्थ नसे. कारण चितळे मास्तरांनी पुस्तकाला धरून कधीच काही शिकवले नाही. भूगोल असो, इतिहास असो, इंग्रजी असो वा गणित असो, "कसला तास आहे?" ह्या प्रश्र्नाला "चितळे मास्तरांचा!" हेच उत्तर योग्य होते. सर्वानुमते एखाद्या विषय ठरायचा आणी मग मास्तर रंगात यायला लागायचे. आयूष्यभर त्यांनी अनेक विषय शिकवले, पण काही काही गोष्टी मात्र त्यांना अजिबात कधी जमल्या नाहीत. उदाहरणार्थ, हिंदुस्थानचा नकाशा. पाचदहा मिनीटे फळ्यावर खडू इकडून तिकडून ओढल्यानंतर अगदी ओढगस्तीला लागलेला हिंदुस्थानचा नकाशा तयार व्हायचा!

"हिदुस्तान देश जरासा दक्षिण अमेरिकेसारखा आलाय का रे बुवा?" आपणच मिष्किलपणे विचारायचे. खांद्यावरून आणलेली नकाशाची गुंडाळी क्वचितच सोडीत असत. "हां, पांडू, जरा निट काढ बघू तुझ्या मातृभूमीचा नकाशा--"

मग आमच्या वर्गात ड्रॉइंगमध्ये पटाईत असलेला पांडू घरत चितळे मास्तरांनी काढलेली मातृभूमी पुसून झकास नकाशा काढायचा.

"देव बाकी कुणाच्या बोटांत काय ठेवतो पाहा हं. पांडुअण्णा, सांगा आता. मान्सून वारे कुठून येतात?"

एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.

"हं, गोदाक्का, सांगा आता वारा कुठल्या दिशेला वाहतोय?"

वर्गातल्या मुलींना मिस जोशी, मिस साठे म्हणणारे मास्तर तोपर्यंत शाळेत आले नव्हते. टाय बांधून, मिस जोशीबाशी म्हणणारे देशमुख मास्तर प्रथम शाळेत आले तेव्हा हे साहेबाचे पिल्लू शाळेत कुणी आणून सोडले असे आम्हाला वाटले होते. पायांत पांढरे टेनिसचे शूज घालणारे पिसे काढलेल्या कोंबडीएवढ्या रुंद गळ्याचे देशमुख मास्तर आमच्या शाळेतल्या अपटुडेटपणाची कमाल मर्यादा होते. एरवी बाकीचे सगळे धोतरछाप मास्तर मुलांना बंड्या, बाळ्या, येश्या, पुर्ष्या ह्या नावाने किंवा मुलींना कुस्मे, छबे, शांते, कमळे अशाच नावाने हाका मारीत चितळे मास्तर मात्र 'ढ' मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात 'ढ' होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथीपाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. तिच्या लग्नात चितळे मास्तरांनी नव-या मुलाला "माझी विद्यार्थिनीआहे हो! संसार चांगला करील. पण बाजारात मात्र पैसे देऊन खरेदीला पाठवू नका. बारा आणे डझनाच्या भावाचे अर्धा डझन आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल--काय गोदाक्का?" असे भर पंगतीत सांगितले. 'ढ' गोदीनेदेखील सासरी जाताना आपल्या वडलांच्या पाया पडल्यावर चितळे मास्तरांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला होता. "काय जावईबोवा, अष्टपुत्रा म्हणू की इष्टपुत्रा?" चितळे मास्तर गळ्यात दाटलेला आवंढा दडवीत म्हणाले होते. गोदी पडावात चढली तशी त्यांनी हळूच डोळे टिपलेले मी आणि बाळू परांजप्याने पाहिले होते.

"मास्तर रडतायत बघ!" बाळू अजागळपणे म्हणाला होता.

"चिमण्यांसारखा नाचतात दहाबारा वर्षे ओसरीवर आणि भुर्र्किनी उडून जातात हो--" चितळे मास्तर गोदीच्या वडलांना सांगत होते. ह्याच गोदीची गोदाक्का म्हणून चितळे मास्तरांनी वर्गात इतकी चेष्टा केली होती की, आजच्या जमान्यात पालकांची प्रिन्सिपॉलसाहेबांना चिठ्ठी आली असती. चिठ्ठी तर सोडाच, पण आमचे पालक तर शाळेत मास्तरांनी आपल्या कुलदिपकाला बदडले हे ऎकल्यावर घरी पुन्हा एकदा उत्तरपुजा बांधीत.

"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय?"

"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?" गोदी आपली शंकू वाण्याच्या

दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. "कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी!" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे
आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.

"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.

"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या? राम्या तु सांग."

मग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा की--"

"का रे राम्या?" मास्तर दटावायचे.

"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?"

"तिचा पदर कशाला दिसायला हवा?"

"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं?"

"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स?"

मग सगळ्या वर्गाकडुन "दिवसा वाहतात ते--" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग "गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचा संबंध.....?"

"ना~~~~ही!" पोरे ओरडायची.

"तरी आज आपण आलाय हे ठाऊक आहे त्यांना म्हणून कमी आहे. एरवी शाळेचं छप्पर डोक्यावर घेतात__" चितळे मास्तर शांतपणे त्यांना सांगत होते.

"पण जरा शिस्त लावायला हवी!" हसतखेळत संप्रदायाचा पुरस्कार करणाऱ्या इन्सपेक्टरांनी त्यांना गंभीरपणाने बजावले.

चितळे मास्तरांनी आपल्या साऱ्या आयूष्यात कुणालाही शिस्त नावाची गोष्ट लावायचा प्रयत्न केला नाही. स्वतःला लावली नाही. त्यांनी त्यांच्यापुढे आलेल्या सर्वोच्यावर फक्त प्रेम केले. प्रेमळ शब्द न वापरता प्रेम केले. वर्गात एखाद्या मुलाने उत्तम निबंध लिहीला की दहापैकी आठ मार्क द्यायचे. मुलगा कुरकुरला की विचारायचे, "का रे बोवा?"

"सर, पण दोन मार्क का कापले?"

"तीन कापायचं जिवावर आलं माझ्या!"

इंग्लिश भाषेवर मात्र चितळे मास्तरांचे फार प्रेम होते. उच्चार अत्यंत देशी! शिकवण्याची पद्धत अगदी संस्कृत पाठशाळेसारखी.

पहिली-दुसरीच्या वर्गाबाहेरून जाणाऱ्याला आत इंग्रजी चालले आहे की पोरे 'ज्ञानेश्वरी'तल्या ओव्या म्हणाताहेत ते कळत नसे. अजूनही मला त्यांची ती 'आय?' 'गो!' 'यू?' 'गो!', 'वुई?' 'गो!', 'ही' 'गो~ज!' ची चाल आठवते. इंग्रजी साभिनय शिकवायचे. "आय ऍम?" असा प्रश्र्न विचारून हवेतल्या हवेत हाताने भुरका घ्यायचे, की पोरे "ईटिंग" म्हणायची. मग तुरूतुरू चालत "आय ऍम....?" की पोरे "वॉकिंग" म्हणून कोकलत. मग खुर्चीवर मान टाकून डोळे मिटून पडत आणि म्हणत, "आय ऍम...?" "स्लीपिंग" अशी पोरांची गर्जना झाली की झोपेतून दचकून जागे झाल्यासारखे उठून, "गाढवांनो, माझी झोप मोडलीत!" म्हणत आणि पुन्हा तीच पोज घेऊन खालच्या आवाजात म्हणायचे, "आय ऍम...?" मग सगळी पोरेदेखील दबलेल्या स्वरात "स्ली~पिंग" म्हणायची. "आय ऍम स्लीपिंग" च्या वेळी खुर्चीवर मान टाकताना हटकून टोपी खुर्चीमागे पडायची. पोरे गुदमरल्यासारखी हसत. चितळे मास्तरांच्या ते लक्षात आले, की "मुगूट पडला का आमचा?" म्हणून टोपी उचलून डोक्यावर चेपीत. असे भान हरपून शिकवणारे शिक्षक त्यानंतर मला आढळले नाहीत. "आय ऍम क्रॉलिंग" च्या वेळी चक्क वर्गात लहान मुलासारखे गुडघ्यावर चालायचे, किंवा वर्गातल्या एखाद्या पोराला धरून रांगायला लावायचे. चितळे मास्तरांचा तास ज्या वर्गात चालू असे तिथे इतका दंगा चालायचा की पुष्कळ वेळा शेजारच्या वर्गातले मास्तर ह्या वर्गाला कुणी धनी आहे की वर्ग हसताखेळता ठेवावा! त्यांच्या तासाला तास कधी वाजला ते कळत नसे. दुसऱ्या तासाचे मास्तर दारात येऊन ताटकळत उभे असायचे.

शाळेतल्या सर्व मास्तरांना चितळे मास्तरांची खोड ठाऊक होती. त्यामुळे एक वर्ग संपवून दुसऱ्या वर्गाची पुस्तके किंवा वह्या गोळा करायला चितळे मास्तर कॉमनरुममध्ये जाऊन पोहचेपर्यंत त्या वर्गाची लाइन क्लियर झाली नाही हे ते ओळखीत. चितळे मास्तर अत्यंत विसराळू होते. वर्गात वहाणा विसरून जाणे हा नित्याचा कार्यक्रम. मग विद्यार्थ्यापैकी कोणीतरी त्या पुढल्या वर्गात पोहचवायच्या. "अरे, भरतानं चौदा वर्षे सांभाळल्या! तुम्हाला तासभरदेखील नाही का रे जमत?"

जोडीचे शिक्षक त्यांची खूप थट्टा करीत असावे. सहलीच्या वेळी हे लक्षात येई. चितळे मास्तरांना सहलीचा विलक्षण उत्साह. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग वगैरे किल्ले आम्ही त्यांच्याबरोबर पाहिले. पहिलीत गावाबाहेरच्या आमराईपासून सुरवात होई. चितळे मास्तर आमचे स्काउटमास्तरही होते. स्काउटमास्तरांच्या पोषाखात त्यांना जर वेडन पॉवेलने पाहिले असते तर सारी स्काउटची चळवळ आवरती घेतली असती. त्या वेळी स्कॉउटमास्तर हिरवा फेटा बांधायचे. चितळे मास्तरांच्या डोक्यावर तो फेटा दादासाहेब खापड्यांच्या फेट्यासारखा गाठोडे ठेवल्यासारखा दिसे. गावातल्या य्च्चयावत पोरांना त्यांनी पोहायला शिकवले. पोहायला शिकवायची मात्र त्यांची डायरेक्ट मेथड होती. मेहंदळे सावकाराच्या प्रचंड विहिरीत शनिवारी दुपारी ते पोरे पोहायला काढीत. आणि नवशिक्या पोराला चक्क काठावरून ढकलून देत. मागून धोतराचा काचा पकडून आपण उडी मारीत. कधी कधी खांद्यावर पोरगे बसवून उडी घेत. जो नियम मुलांना तोच मुलींना! माझ्या लहानपणी गावात न पोहता येणारे पोरगे बहुधा मारवड्याच्या घरातले किंवा मामलेदाराचे असे! साताआठ वेळा नाकातोंडात पाणी गेले की पोरे बॆडकासारखी पोहत. पोहून संपल्यावर डोकी ओली राहीली की ते स्वतः पंच्याने पुसत. आमच्या गावतले सगळे आईबाप, देवाला बोकड सोडतात तशी चितळे मास्तरांना पोरे सोडून निर्धास्त असत. शाळेतच काय पण रस्त्यात किंवा देवळातदेखील पोराचा कान धरायची त्यांना परमिशन होती.

मॅट्रिकच्या वर्गात पोहचल्यावर निवडक पोरांना वर नंबर काढण्यासाठी चितळे मास्तरांच्या घरी पहाटे पाचला जावे लागे. मास्तर आंघोळबिबोंळ करून खळ्यात मोठ्यामोठ्याने कसले तरी स्तोत्र म्हणत उभे! एका जुनाट बंगलीवजा घरात त्यांचे बिऱ्हाड होते. मास्तरीणबाईंना आम्ही मुलेच काय पण स्वतः चितळे मास्तरदेखील 'काकू' म्हणत.

"काकू~~ वांदरं आली गो. खर्वस देणार होतीस ना?" असे म्हणत अधून-मधून खाऊ घालीत. आणि मग शिकवणी सुरू व्हायची. ही शिकवणी फुकट असे. आणि शिकवण्याची पद्धतदेखील वर्गापेक्षा निराळी. त्या वेळी आमच्या गावात वीज नव्हती आली. मास्तरांच्या घरातल्या डिटमारचा दिवा आणि आम्ही घरातून नेलेले दोनचार कंदील ह्या प्रकाशात अभ्यास सुरू होई. चितळे मास्तर एक आडवा पंचा लावून उघडेबंब असे भिंतीजवळच्या पेटीवर बसत. ही भेलीमोठी पेटी हे त्यांचे आवडते आसन होते.

त्या पेटीत खच्चून पुस्तके भरली होती. मास्तरंचा गोपू माझ्या वर्गात होता. वेणू माझ्यापेक्षा मोठी आणि चिंतामणी धाकटा. ही तिन्ही मुले गुणी निघाली. गोपू मॅट्रीकला दहावा आला होता. हल्ली तो दिल्लीला बड्या हुद्यावर आहे. वेणूदेखील बी०ए० झाली. चिंतामणीने मॅट्रिकनंतर शिक्षण सोडले. त्याला मास्तरांनी चिपळूणला सायकलचे दुकान काढुन दिले. त्याला मास्तर एडिसन म्हणत. हे कारटे लहानपणापासून काहीतरी मोडतोड करीत असे. गोपू आमच्याबरोबर शिकायला बसे. एरवी तो मास्तरंना आप्पा म्हणे. शिकायला बसला की आमच्याबरोबर 'सर' म्हणत असे. आम्ही चितळे मास्तरांनी नक्कल करायचे तसा तोदेखील करत असे. त्याचा वर्गात पहिला नंबर असायचा, पण मास्तरांनी पार्शलिटी केली असे चुकुनदेखील आम्हाला वाटले नाही. कारण वर्गात इतर मुलांप्रमाणे त्यालादेखील ते "गोपाळराव चितळे, उठा. द्या उत्तर ." असे म्हणायचे . कान धरून उभे करायचे. चारचौघांसारखाच तोही!

पहाटचे त्या अधुंक प्रकाशीत चितळे मास्तरांच्या ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात चाललेला तो स्पेशल क्लास अजूनही माझ्या स्वप्नात येतो. तिथे मी 'रघुवंश' शिकलो, टेनिसन, वर्डस्वर्थ ह्यांच्या कविता वाचल्या. वर्गात शिकवताना त्यांच्या आवाज चमत्कारीक वाटे. पण पहाटे घरी ते 'रघुवशं' म्हणायला लागले की गुंगी यायची. आमच्या आधी ह्या वर्गात शिकलेल्या तीनचार मुलांनी 'जगन्नाथ शंकरशेट' मिळवली होती. आमच्यात कुणी तसा निघाला नाही. जरा ओशाळेच होऊन आम्ही त्यांना पास झाल्याचे पेढे द्यायला गेलो होतो.

"काकू, कुरुक्षेत्रातले विजयी वीर आले. ओल्या नारळाच्या करंज्या ना केल्या होत्यास? एलफिन्स्टन कॉलेजात जायचं बरं का रे! तुझ्या बापसाला बोललोय मी! उगीच कुठल्या तरी भाकड कॉलेजात जाऊ नकोस. पुण्यासच जाणार असलास तर फर्ग्युसन! बजावून ठेवतोय. कुठल्या कॉलेजात?"

"एलफिन्स्टन!"

"स्पेलिंग सांग."

मग काकू करंज्या पुढे ठेवता ठेवता म्हणाल्या होत्या, "आहो, मिस्त्रुडं फुटली त्यांना आता! स्पेलिंग कसली घालता? मुंबईस जायचास की पुण्यास?"

"बघू, बाबा धाडतील तिथं जायचं___"

चितळे मास्तरांच्या आणि असंख्य मुलांच्या वाटा इथून अशाच तऱ्हेने वेगळ्या झाल्या आहेत. मग अनेक वर्षात गाठी पडत नाहीत. पण नित्याच्या व्यवहारातदेखील त्यांची आठवण राहीली आहे. "ओळीत फक्त आठ शब्द लिहायचे" हा त्यांचा दंडक हातवळणी पडला आहे. "नववा शब्द आला ओळीत तर काय लिहीलं आहेस ते न वाचता पेपरावर भोपळ्याचं चित्र काढीन." ही धमकी ते खरी करून दाखवीत.

एके दिवशी सकाळी मुंबईला माझ्या दारावरची घंटी वाजली. हातात पिशवी घेऊन दारात चितळे मास्तर उभे! तोच कोट, तीच ईशान्य-नैॠत्य टोपी, डाव्या हातात पिशवी आणि उजवा हात तसाच तर्जनी वर करून धरलेला.
"मास्तर, तुम्ही!" मी आश्र्चर्याने विचारले.
"धन्य हो तुझी मुंबई!" आत येत येत मास्तर म्हणाले.
"का, काय झालं?" हिने त्यांच्या हातातली पिशवी घेत विचारले.
"होयचंय काय? हां, त्या पिशवीत आंबे आहेत. आदळशील धांदरटासारखी."

माझी पत्नीदेखील त्यांचीच विद्यार्थिनी आहे. त्यामुळे आम्हा दोघांनाही ते वाटेल ते बोलू शकतात.

"का? मुंबईनं काय केलं तुमचं?"

"अरे, पूर्वी राहत होतास ती जागा ठाऊक मला. ह्या भागात कधी आलेलोच नाही मी. वरळीला मागं एकदा जांबोरी झाली होती स्काउटची तेव्हा आलो होतो. जंगल होतं सगळं. तुझ्या इमारतीचा कुठं पत्ताच लागेना! बंर, तू लोकमान्य टिळकांचा बाप___"

"मी?"

"हो! म्हणजे जगप्रसिद्ध तू-- मला वाटलं, सगळ्यांना ठाऊक असेल तुझा पत्ता. खालच्या पानवाल्याससुद्धा ठाऊक नाही तू वर राहतोस ते! मी म्हटलं, 'अरे नाटकात असतात ते-- विलायतेला जाऊन आले.' तशी चावट माणूस म्हणतो कसा, 'साहेब, हल्ली भंगीदेखील जाऊन येतात.' खंर आहे म्हणा ते. आम्हाला आपलं कौतुक. इतरांस काय होय! निदान तुझी नाटकं तरी फुकटात दाखवून काढ सगळ्यांना म्हणजे विचारणाराला पत्ता तरी सांगतील जरा आदरानं."

"केव्हा आलात?"

"आज बरोबर दहा दिवस झाले."

"छे! वेणीच्या नवऱ्याची बदली झाली नाशकाला. मी आपला जनू पानश्याकडे टाकलाय डेरा!"

"जनू पानशे म्हणजे___"

"दुधवाल्या पानशाचा रे! तुझ्याच ना वर्गात होता?...नाही. तो अडतीसच्या बॅचमधला. ढ रांडेचा. बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवणारा!"

चितळे मास्तर बदलायला तयार नव्हते. हा बाजीरावाची शेंडी अहमदशहा अबदालीला चिकटवण्याचा विनोद त्यांच्या वर्गातल्या ती पिढ्या ऎकत आल्या आहेत.

खुर्चीवर स्थानापन्न होऊन पाच मिनिटेही झाली नव्हती. तेवढ्यात त्यांची नजर टीपॉयवरच्या सिगारेटच्या पाकिटावर गेली.

"सिगरेटी फुंकतोस वाटतं?"

शाळा सोडल्याला आता मला पंचवीसएक वर्षे झाली. पण अजून कधी मी चितळे मास्तरांच्या पुढे सिगरेट ओढली नव्हती.

"आमचा गोपूही ओढतो. माझ्यासमोर नाही ओढीत, पण ताडलंय मी. आण बघू रे तुझी सिग्रेट. मी देखील ओढून पाहावी म्हणतो. गावी धैर्य नाही होत." साठीच्या घरातले चितळे मास्तर सांगत होते. "तू जरा आत जा गो." हिला म्हणाले.

"राहू दे मास्तर-- उगीच ठसका लागेल."

"नको म्हणतोस? बाकी असल्या चैनीला सवडच नाही झाली हो कधी!"

"बंर, मुंबईला किमर्थ आगमन?"

"भिक्षां देही! दुसरं काय? शाळेत ओपन एअर थेटर बांधतोय!"

"काय बांधताय?" मी दचकून म्हणालो.

"दचकलाससा एवढा! नाटकवाला तू-- तुला रे दचकायला काय झालं? सरकारकडून निम्मी ग्रांट मिळायची आहे. निम्मे पैसे आम्ही गोळा करणार. गेल्या वर्षी नाट्यस्पर्धेत शाळेचा पहिला नंबर आला जिल्ह्यात!"

"आपल्या शाळॆचा?"

"हो हो, आपल्या शाळेचा ! 'बेबंदशाही' बसवलं होतं. झिलग्या पावशेकराच्या मुलानं संभाजीचा पार्ट असा फक्कड केला म्हणतोस-- थेटर नुसतं टाळ्यांनी दणाणून सोडलंनीत."

हे सर्व मला नवीनच होते.

"आणि ही नाटकंबिटकं तुम्ही करू देता? आमच्या गॅदरिंगला नाटक करायचं म्हटल्यावर तुम्ही वर्गाबाहेर उभा केला होतात मला."

"पुर्ष्या, फुकट हो तू. अरे, टाइम्स हॅव चेंजड! हल्ली आपला सकाळचा क्लास बंद. शाळाच मुळी साताला सुरू होते. एक शिफ्ट सकाळी आणि दुसरी दुपारी. गिरण झाली आहे. बावन मास्तर आहेत शाळेत. चंद्रसूर्य___"

"चंद्रसूर्य?"

"एकाच आकाशात; पण एक उगवला की दुसरा मावळतो."

"असं असं-- बरं, जेवूनच जा."

"नाही नाही. नुरू काजीकडे जेवायचं आमंत्रण आहे. आपल्या इस्माईल काजीचा मुलगा. चाळीसच्या बॅचमधला. हुषार पोरगा. सचिवालयात आहे. एज्युकेशन मिनीस्ट्रीत. त्याच्यामुळंच तर ओपन एअर थेटरची ग्रांट मिळाली. ती सगळी सव्यापसव्यं तोच करतो. काय इंग्लिश लिहीतो! परवा मजा सांगत होता. दुसरा कुणी तरी हापिसर बदलून आला--त्याची फाइल याच्याकडे आली होती. फाइलवरच्या नोटिंगमध्ये प्रत्येक ओळीत आठ शब्द! सहज सुचलं-- फोन केला. ओळख नाही हो ह्याचीन त्याची--फोनवर विचारलं, जोगळेकर का? तो म्हणाला, हो! मी म्हणाला काजी बोलतोय.तो चटकन 'यस सर' म्हणाला. हाताखाली असेल, एरवी 'सर' कशाला म्हणतोय? काजी म्हणाला, चितळे मास्तरांचे का हो विद्यार्थी? तो जोगळेकर पलीकडे आठ इंच उडाला खुर्चीवर! कसं ओळखलंत हो म्हणाला. तशी काजी म्हणाला, फाइलवरच्या नोटींगमध्ये एका ओळीत नववा शब्द आला तो खोडून पुन्हा खालच्या ओळीत तस्सा लिहीलात...आपल्या हरी जोगळेकराचा मुलगा. अठ्ठेचाळीसची बॅच! इंग्लिश, मॅथ्स, संस्कृत आणि फिजिक्समध्ये डिस्टिंक्शन बी०ए० ला दुसरा आला होता, तोही आहे सचिवालयात फायनान्समध्ये."

"मग आता काजीकडे जाणार जेवायला?"

"बजावून सांगितलय--मटणबिटण घालशील खायला, तर तुझ्या शिक्षणमत्र्यांला जाऊन सांगीन तिसरीत भूगोलाच्या पेपराची कॉपी केली होती यानं म्हणून! गोष्ट खरी आहे हो. हुषार पोरांनादेखील मोह होतो."

"बरं, मग आता काय चहा घेणार की कॉफी?"

"तुझी सहधर्मचारिणी देईल ते घेईन. काय देत्येस? गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधी---काकू फार आठवण काढत्ये गो तुझी!"

"बरी आहे प्रकृती?"

"मोतीबिंदू झालाय. बाकी मास्तराच्या घरात बायकोच्या गळ्यात काही मोत्ये पडली नाहीत, डोळ्यांत पडली. गोपू म्हणालाय आपरेशन करायचं म्हणून आपला साने झाला आहे आय स्पेशलिस्ट! गेल्या खेपेस भेटलो होता त्याला! मोठा गोड मुलगा. हस्ताक्षर काय सुंदर त्याचं...कविता करी--- आता डोळ्याची आप्रेशन करतो."

"मग आता कुठं कुठं भिक्षांदेही झाली? आणि मास्तर, हे नाटकाचं थिएटर शाळेत करायचंय काय?"

"शाबास नाटकवाला असून इतका सनातनी? अरे, आमचं 'बेबंदशाही' पाहिलं असतंस तर माझी पाठ थोपटली असतीस."

"तुमची?"

"म्हणजे डायरेक्टर ना मी?"

मी एकेक नवलच ऎकत होतो, "तुम्ही डायरेक्टर?"

"मग तुला काय वाटलं तूच? अशी घोकंपट्टी करून घेतली पोरांकडून--नुसतं आपापलंच नव्हे, सगळ्यांना सगळं नाटक पाठ! पहाटे पाचाला जमवीत असे! कार्ट्याची मजा बघ. साताच्या शाळेला डोळे चोळीत आठापर्यंत उगवतात. नाटकाच्या तालमींना मात्र संभाजीपासून औरंगझेबापर्यंत सगळे पाचाला हजर!"

"सगळ्यांकडून कशाला सबंध नाटक पाठ करून घेतलंत?"

"शहाणा आहेस! आयत्या वेळी झाला एखादा आडवा तापानं किंवा सर्दी-खोकल्यानं तर नाटक नसतं का झोपलं? पण मुहूर्त पाहून नारळ फोडला होता. माझा नाही विश्र्वास ह्या भाकड गोष्टींवर; पण पोरं म्हणाली, मुहूर्त पाहून नारळ फोडा.बाकी मला ह्या पोरांचं काही कळेनासंच झालंय हो! वर्गात हल्ली एकजण टोपी घालून येत असेल तर शपथ! खिशात लेखणी नसते, पण फणी आहे. एकेकाच्या भांगाच्या तऱ्हा पाहा. पण शिंचे मुहूर्त पाहतात, हातांत कुठल्या कुठल्या बाबांच्या आंगठ्या घालतात, गळ्यांत लाकिंट घालतात. पोहण्याबिहिण्याचे वर्ग लिक्विडेशनमध्ये निघाले--धिस इज रियली पझलिंग! ह्या दुसऱ्या महायुद्धानंतर म्हण किंवा स्वातंत्र्यानंतर म्हण, बराच काहीतरी गोंधळ झालाय. गावात तुमच्याही वेळी सिनेमा होता, पण तुम्ही काय शाळा चुकवून नाही जायचे. आता निम्मी पोरं त्या थेटरात! तुला आश्र्चर्य वाटेल, नवा सिनेमा लागला की मीदिखील जातो."

"सिनेमाला?"

"सिनेमाला नव्हे, इंटर्वलला."

साठीशी पोहोचलेले चितळे मास्तर जरासे 'हे' होत चालले आहेत की काय असे मला वाटले. मी 'आ' वासून त्यांच्याकडे पाहू लागलो.

"झापड मिटा." फार दिवसांनी चितळे मास्तरांचे हे आवडते वाक्य ऎकले. वर्गात पोरांना तोंड उघडून बसायची सवय असते. बावळटासारखे तोंड वासून पोर बसले की मास्तर नेहमी "झापड मिटा" म्हणायचे.

"पण मास्तर. 'इंटर्वल' बघायला जातो म्हणजे काय कळलं नाही."

"नाहीच कळायचं! अरे, आधी जाऊन काळोखात उभा राहतो. आपल्या शिर्क्याचं थेटर. तिकीट बसत नाही मला. विद्यार्थी तो माझा अगदी सुरूवातीच्या बॅचमधला. त्याच्याकडून इंटर्वलचा फ्री पास मागून घेतलाय. तर सांगत होतो काय, काळोखात उभा राहतो आणि चटकन उजेड पडला की पाहतो प्रेक्षकांत शाळेतली कोकरं किती घुसली आहेत ते! एकदाच दिसला तर चिंता नाही. पण त्याच सिनेमास दुसरुंदा रे काय पाहायला आलास?"

"उद्योग झाला म्हणायचा हा!" ही म्हणाली.

"तुम्हाला कळायचं नाही! फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जमाना गेला आता. आता म्हणजे मीनाकुमारी, बीना रॉय--- उद्या इतिहासाच्या तासाला ह्यांचीच चरित्रं शिकवायचो. चालायचचं. टाइम्स हॅव चेंच्ड. ते जाऊ दे. माझा मुख्य मुद्दा भिक्षांदेहीचा---त्याचं काय करतोस बोल."

"तुमचा मुक्काम किती दिवस?"

"पुढल्या आठवड्यात शाळा सुरू होते. परवा तरी निघायला हवं."

"मग आज रात्री जेवायला या."

"हल्ली रात्रीचं जेवण बंद!"

"मी उपासाचं करीन!"

"अग, व्रत म्हणून बंद नव्हे. आयूष्यात व्रत एकच केलं---- पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसुन जगात पाठवून देणं. पण रात्री राहायला येईन बापडा इथं."

"अवश्य या. पण घर सापडेल का रात्रीचं?"

"ते मात्र बरीक कठीणच हो! वास्तविक विल्सनचा स्टूडंट हो मी. अरे, पण माझ्या वेळेची चौपाटी म्हणजे चर्नीरोड स्टेशनाच्या पायऱ्या धुऊन जायची. सखूबाईच्या खाणावळीत भोजन आणि मोहन बिल्डिंगमध्ये वास! आता दरवर्षी बघतो तर मुबंई बदलत चालली आहे. परवा पाच मिनीटं कॉलेजकडे जाऊन आलो आत हिंडून! आपले दोन विद्यार्थी आहेत विल्सनला... आमच्या वेळी एलफिन्स्टनपेक्षा विल्सन स्वस्त पडे. मॅकेंझी होता प्रिन्सिपॉल! डिव्होडेट माणसं! त्यांची ती डिव्होशन बघूनच तर ह्या शिक्षकांच्या धद्यांत शिरलो मी. तशी एक महीना कलेक्टर कचेरीत नोकरी केलीय--खिशात 'केसरी' सापडला म्हणून काढून टाकलं होतं मला म्हणून तर ह्या राष्ट्रकार्यात शिरलो! मुंबई सोडताना मॅकेंझींना भेटायला गेलो होतो. म्हणाला, आता काय करणार? मी म्हटलं, मास्तरकी! मला पाठीवरून हात फिरवून ब्लेसिंग्ज दिली होती त्यांनी. त्या वेळी चौपाटीवर आमचं कॉलेज झक्क उठून दिसे. आता म्हणजे टोलेजंग इमारतींत द्डून गेलंय. समोरच्या समुद्राच्या लाटा तेवढ्या पुर्वीसारख्या राहिल्या आहेत. बाकी एव्हरीथिंग हॅज....?"

"चेंजड!" मी आणी ही एकदम म्हणालो. दोघांनाही ती सवय होती.

"बरं मग मी न्यायला येतो तुम्हाला. कुठं असाल संध्याकाळी?"

"संध्याकाळी मी जाणार आहे, आपल्या--अरे, तुझ्याच बॅचमधला तो--- मुकुंद पाटणकराकडे."

"म्हणजे हिंदू कॉलनीत?"

"यस! ही ईज डुइंग व्हेरी वेल! मोटर घेतली आहे. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा खूप हिंडवलनीत. तशा मुंबईत माझ्या पाचसहा मोटारी आहेत..." चितळे मास्तरांचे ते मिष्कील हसणे कायम होते.

संध्याकाळी मी मुकुंदाच्या घरी गेलो. "मास्तर आले आहेत ना रे?"

"हो, आत आहेत. बेबीला गोष्ट सांगताहेत."

मला एकदम आठवले. मुकुंदाची पाचसहा वर्षाची मुलगी गेले वर्षभर पोलियो होऊन बिछान्यावर पडली होती. मी आत डोकावून पाहिले. मास्तर तिला गोष्ट सांगण्याच्या रंगात आले होते. कुठल्या तरी राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्राचे विमान आकाशातून गेले तेव्हा दोन्ही हात पसरून चितळे मास्तर त्या खोलीभर धावले. मी आणि मुकुंदाने एकमेकांकडे पाहिले. मुकंदाच्या डोळ्यांत पाणी तरारले होते.

"इथं आल्या दिवसापासून रोज संध्याकाळी बेबीला एक गोष्ट सांगून जातात."
मास्तरांची गोष्ट संपत आली होती.

"आणी अशा रीतीनं तो राजपुत्र आणि राजकन्या अत्यंत सुखानं नांदू...?"

"लागली!" बेबी, मुकुंदा आणि मी एकदम म्हणालो.
मी आणि मास्तर टॅक्सीत बसलो.

"जरा थांबा."

"काय रे?" मास्तर म्हणाले.

"काही नाही. जुनी सेवा---पायांत चप्पल नाही तुमच्या."

"राहील्या वाटतं वर. राहू दे. उद्या यायचंच आहे."

"थांबा, मी आणतो..."

"छे छे! खुळा की काय?"

मी वर गेलो. मुकुंदाच्या दारातल्या चपलांच्या स्टॅडवरून मास्तरांच्या चपला शोधून काढणे अवघड नाही गेले--- कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या!

......

अशोक
(जन्म: इ.स.पूर्व ३०४ -मृत्यू इ.स.पूर्व २३२) हा मौर्य घराण्यातील प्रसिद्ध सम्राट होता. त्याने भारतावर इ.स.पूर्व २७२ - इ.स.पूर्व २३२ च्या दरम्यान राज्य केले. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपला राज्यविस्तार केला. अशोकाला भारताच्या इतिहासात सर्वात महान सम्राटाचे स्थान दिले आहे. असे मानतात की प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटाची पदवी फक्त महान सम्राटांना दिली ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये (रामायण, महाभारत इत्यादी) आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वा बाबतची साशंकता आहे. ( नहुष, युधिष्ठिर इत्यादी). असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. अशोकाने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. पाकिस्तान ,अफगाणिस्तान पूर्वे कडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान मगध होते. ज्याला आजचा बिहार म्हणतात व पाटलीपुत्र त्याची राजधानी होती. ज्याला आज पटना नाव आहे. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्याने हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वता:ला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्‍यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची ऐतिहासीक माहीती भारताच्या प्राचीन कालातल्या कोणत्याही ऐतिहासीक व्यक्तीपेक्षा जास्त आहे.

बालपण व सुरुवातीची कारकीर्द
साँची स्तूप

अशोक हा बिन्दुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिन्दुसार यांना अनेक पत्न्या होत्यातील त्यातील धर्मा ही अशोक ची आई होती. ती जन्माने ब्राम्हण असल्याने, तिला राजपरिवारात फारसे मानाचे स्थान नव्हते. अशोक हा बिन्दुसार च्या अनेक पुत्रामध्ये शेवटून दुसरा धाकटा होता त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची आपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारुन राज्य सुखाचा त्याग केला त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली ही तलवार अशोकाने सापडवून अशोकने आपल्याजवळच ठेवली. . अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिन्दुसार ने तरुण पणीच त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते जे त्याने सहज पार पाडले.

राज्यरोहण
भारताच्या झेंड्यावरील अशोक चक्र

अशोकचे जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वास ही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर किर्ती दुमदुमु लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिन्दुसार अशोकलाचा सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता बिन्दुसारचा जेष्ठ्य पुत्र सुशीम, सुशीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी अशोकला तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. जिथे सुशीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते. अशोक येण्याच्या बातमीनेच उठाव शमला व अशोकची किर्ती अजून वाढली. (The province revolted once more during the rule of Ashoka, but this time the uprising was crushed with an iron fist)

अशोकच्या यशाने त्याच्या भावांवरील दु:स्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुशीमने बिन्दुसारला अशोकाविरुद्द भडकावले, या वादातून तात्कालीन मार्ग म्हणून बिन्दुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला जो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंग मध्ये जाउन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली जी नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत.

कंदहार मधील अशोकाचा शिलालेख
मध्यतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिन्दुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. याकाळात असे मानतात की सुशीम द्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुष्रुशा करण्यासाठी बौद्ध धर्मिय परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारीका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदीशा येथील एका व्यापा‍र्‍याची मुलगी होती. ती बौद्ध धर्मिय असल्याने बिन्दुसार ला हा विवाह पसंत पडला नाही त्याने अशोकला पाटलीपुत्र मध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करुन टाकले.

पुढील काही वर्षे अशोकची शांतीमय गेली. बिन्दुसारचे इसापूर्व २७३ मध्ये निधन झाले व सुशीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्नात देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला ज्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने व्यतीथ अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाडाव केला. व आपल्या सर्व बंधूंची हत्या केली या घटनेनंतरही अशोकचा राग कमी झाला नव्हता मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा म्हणून उदयास येउ लागला.

अशोकाचे साम्राज्य 
राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षाच्य काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान- इराणच्या सीमे पर्यंत, उत्तरेस अफगणिस्तान व दक्षिणेस केरळपर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली.


कलिंगचे युद्ध
कलिंग चे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे. अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होउ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओरिसा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात.

कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यावसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनार्‍यावर सत्ता हवी होती, जी कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हे खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ सुमारास सुरु झाले. सुशीम चा एक भावाने कलिंगामध्ये मदत घेतली होती. अशोक ने हे कारण मानले व कलिंगला शरण येण्यास सांगितले.

सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंग मध्ये दहशत माजवला मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले.

बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार

अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने पाहिले ते फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडणाच्या दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता. हे पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले व हा विजय नाहीतर पराजय आहे असे म्हणून त्या प्रचंड विनाशाचे कारण स्वता:ला मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वता:लाच प्रश्ण विचारले. एका राज्याची संपन्नता वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे. ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसेचा, प्रेम दया हि मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्मियांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले व तसेच त्याने स्वता.ला बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरावले. या नंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले. बौद्द धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जवाबदार असे बहुतेक इतिहासकार मानतात.

अशोकाच्या ह्या कार्यात त्याच्या देवी पासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली,.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्द धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादीत राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्द धर्मियांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. आकडा खूप असला तरी त्यातील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकीर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनिसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णू पणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णूरित्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले.

अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड असे मानतात की अशोकाचीच कल्पना आहे. आपण सम्राट असल्याचा अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्वे विशारद केली, अहिंसा, सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधार्‍या माणसांना मान देणे, संत ब्राम्हण, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अश्या आचार तत्वांना जगात कोणताही समाज नाकारु शकणार नाही.

अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धा नंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहेमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्दच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची किर्ती ग्रीस, इजिप्त पर्यंत पोहोचली होती असे कळते.

अशोकाचे स्तंभ व शिलालेख
शोक स्तंभ
अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाचा ऐतिहासिक वारसा दिला म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोका आगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारश्या नोंदी आढळत नाहीत त्यामुळे तत्कालिन ऐतिहासिक मिळवणे जिकरीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार आजवर सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले, अजूनही उत्खननांमध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे अशोका संदर्भात बरीचशी माहिति शिलालेखांवरुन व स्तंभांवरुन आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे पियदसी ( पालीमध्ये) अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला आहे. ज्याचा अर्थ चांगला दिसणारा व देवांचा चाहता असा होतो. त्याच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता जाणवते, अशोकाने हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यातील मार्गांवर 
 महाबोधी मंदिर 
 

मुख्य चौकांमध्ये प्रस्थापीत् केले होते जेणेकरुन प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणार्‍याला अशोकाच्या राज्यातील आचारविचार कळावेत. अशोक आपल्या प्रजेला आपली मुले संबोधत असे व अहिंसेबद्द्ल व बौद्ध धर्माच्या तत्वांवर (धम्म व योग्य आचरणावर) त्याचा भर असे. अशोकाच्या लेखांमध्ये त्याच्या स्तुतीपर अनेक सुमने आहेत. अशोकाने मिळवलेल्या प्रदेशाची माहीती देतात,
तसेच शेजारच्या राज्याबद्द्लही माहीती आहे. एका स्तंभामध्ये कलिंग युद्धावर वर्णन आहे त्यात अशोकाची
धर्माराजिका ,पाकिस्तान
सहाय्यक राज्ये व नागरी व्यवस्थापनेवरही माहीती कोरली आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वात प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांना व शास्त्रज्ञांच्या अशोक कालिन चिन्हे, लेख, स्तंभांचा हा खूप महत्वपूर्ण ठेवा आहे. मौर्य साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी उदृत करतात. अशोकाच्या चिन्हांवरुन त्याला भावी पीढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार त्याला कोणत्या गुंणांसाठी त्याला लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते. अशोक खर्‍या आयुष्यात असाच होता का? यावर दुजोरा देणारी माहीती अजून उपलब्ध नाही. 

देवकोठा स्तूप